नांदेड: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. गावोगावी राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केली जातं आहे. या बाबत गावबंदीचे बॅनर देखील लावले जातं आहेत. त्यातचं गुरुवारी रात्री भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. गावात प्रवेश केल्याने आंदोलकांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा विरोध करत ताफ्यातील दोन गाड्या फोडल्या. कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात ही घटना घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला ठिकठिकाणी पाठींबा मिळतोय. आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय.
शंभरहुन अधिक गावात पुढाऱ्यांना गावबंदीचे बॅनर
मराठा आंदोलनाची धग गावागावात जाऊन पोहोचली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने आरक्षणाच्या मागणीला आणखी बळ मिळाले आहे. आजपर्यंतच्या सर्वच सरकार मध्ये बहुसंख्य मराठा आमदार, खासदार होते. पण या पुढाऱ्यांनी आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही म्हणून आता मराठा समजाच्या निशाण्यावर हे पुढारी आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक गावांनी या पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. गावाच्या प्रवेशावरच पुढाऱ्यांना गावबंदी चे बॅनर लावण्यात आले आहेत. जो पर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांनी गावात पाऊल ठेऊ नये असा इशारा ग्रामस्थाकडून देण्यात आला आहे. पुढाऱ्यांना गावबंदी सोबतच अनेक गावांनी आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकलाय.या गावबंदी मुळे पुढाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.