• Tue. Jun 17th, 2025

पंतप्रधान मोदींचं मराठा आरक्षणावर मौन, आंदोलकांचा संयम सुटला, सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध

Byjantaadmin

Oct 27, 2023

सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सातत्याने धगधगत असलेल्या मराठा आरक्षणाच्या वणव्याने आता उग्र रुप धारण केले आहे. कारण, आतापर्यंत केवळ राज्यातील सत्ताधारी नेत्यांना जाब विचारणाऱ्या मराठा समाजाने शुक्रवारी सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या वणव्याची धग आता दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरातील मुख्य चौक असलेल्या पार्क चौकात पंतप्रधान मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातही घोषणबाजी केली.

PM Modi Maratha Reservation

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी डाव्या निळवंडे कालव्याच्या लोकार्पण सोहळ्याच्यानिमित्ताने शिर्डीत आले होते. आदल्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिर्डीत पंतप्रधान मोदी हे मराठा आरक्षणाबाबत काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी मराठा आरक्षणाबाबत चकार शब्दही उच्चारला नाही. त्यामुळेच सोलापूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला. काल विश्वगुरु मोदी राज्यात आले होते. मराठा समाज आशेचा किरण म्हणून त्यांच्याकडे बघत होता. मात्र, ते काहीच बोलले नाहीत, अशी भावना एका आंदोलकाने व्यक्त केली. तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणाबाबत काहीच सांगितले नाही का, असा सवालही आणखी एका आंदोलकाने उपस्थित केला. त्यामुळे आता यावर भाजपच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनीही पंतप्रधान मोदींच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांना आता गरिबांची आणि क्षत्रिय मराठ्यांची गरज उरलेली नाही. आम्ही त्यांच्याकडे आशेने बघत होतो. पण आमची साफ निराशा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी गेले होते का? त्यांनी मराठा आरक्षणाबाबतची राज्यातील परिस्थिती पंतप्रधान मोदींच्या कानावर घातली नाही का, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.

वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमक आंदोलन करणार

अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी साखळी उपोषण सुरू केल्या पासून राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करून तीन दिवस झाले आहेत. तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी दुपारी अचानकपणे एकत्रित येत नरेंद्र मोदीचा पुतळा पेटवून निषेध केला. मराठा बांधव वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी राम जाधव,भाऊसाहेब रोडगे,प्रकाश जाधव,चेतन चौधरी आदी उपस्थित होते. नरेंद्र मोदींचा पुतळा पेटवून दिल्याची माहिती होताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी धावत आले आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *