परभणी : मराठा आरक्षणासाठी राज्यभर विविध प्रकारची आंदोलनं सुरू आहेत. मात्र यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीलाही (Gram Panchayat Election) मराठा आरक्षणाचा फटका बसताना दिसून येतोय. परभणीतील वझुर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणि संरपंचपदासाठी दाखल करण्यात आलेले अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या गावची निवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर आहे.
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील वझुर येथील ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरपंच आणि 11 ग्राम पंचायत सदस्य अशा 12 जागांसाठी या निवडणुकीत एकूण 34 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातले तीन सरपंच पदासाठी तर 31 ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी अर्ज होते. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक नाही असा निर्धार करत इथल्या सर्वच्या सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले.दुसरीकडे पालम तालुक्यातील चाटोरी ग्रामपंचायतमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होती. तिथेही चार जणांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र या चारही जणांनी आज आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत निवडणूक होणार नाही असा निर्धार या गावकऱ्यांनी केला. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणच्या निवडणूक आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे.
येवला तालुक्यातील 10 गावांत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण
मराठा समाजाला आरक्षण द्यावे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून nashikच्या येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव, खामगाव, देवठाण, भुलेगाव ,पिपळखुटे, धुळगावसह जवळपास आठ ते दहा गावातील नागरिकांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे गावातून रॅली काढत जोरदार घोषणाबाजी करत आमरण उपोषणास यावेळी ग्रामस्थांनी सुरुवात केली आहे. या गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असल्याचंही सांगितलं आहे.