शहरटाकळी – शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव, मठाचीवाडी, मजले शहर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गावाच्या चौकात सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. याचा फलक गावाच्या वेशीवर लावण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षाच्या नेत्यांना गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. ‘चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष; मराठा आरक्षण हेच आमच लक्ष्य’असा मजकूर फलकावर आहे.प्रस्थापित राज्यकर्ते हे मराठ्यांची उधड बाजू कधीच घेताना दिसले नाही आणि अजूनही दिसत नाहीत. त्यांना मताची भीती वाटते म्हणून ते आपल्या बाजूने येत नाहीत. राजकीयदृष्ट्या मराठे जागे असतात. पण, त्यांना मतदार म्हणून देखील जागे होणे गरजेचे आहे. नवा राजकीय पर्याय देखील आपण उभा केला पाहिजे,तरच हे सर्व प्रस्थापित पक्ष वठणीवर येथील, हे कळल्याने आणि मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रेरणेने प्रेरित व हक्काच्या आरक्षणासाठी ते देत असलेल्या लढाईस पाठिंबा म्हणून भावीनिमगाव, मठाचीवाडी, मजले शहर येथील सकल मराठा समाजाने सर्व आजी-माजी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करून जिल्ह्यात सर्व प्रथम पुढाकार घेतला असल्याचे नंदकुमार शेळके यांनी सांगितले. गुरुवारपासून (ता.१९) भावीनिमगाव येथील गावबंदीचा बोर्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भावीनिमगाव परिसरातील गावांमध्ये सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी करा. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही.
– प्रा. नंदकुमार शेळके, भावीनिमगाव
आम्हाला देशाची घटना समजते. आता समाज जागा झाला आहे. आरक्षण मिळाले पाहिजे.
– रामजी शिदोरे, मठाचीवाडी