पुणे: आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील लढत पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झाली. या लढतीत भारताने ७ विकेटनी शानदार विजय मिळवला. स्पर्धेतील टीम इंडियाचा हा सलग चौथा विजय ठरला. विराट कोहलीची शतकी खेळीने टीम इंडियाने सहज विजय साकारला.
भारताच्या या लढतीआधी संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत एक मोठी अपडेट आली होती. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर रोहित पुण्याला न येते मुंबईला आला होता आणि तेथून तो वैयक्तीक गाडीने पुण्याला आला. मुंबई-पुणे प्रवास करताना रोहितने ओव्हरस्पीडने गाडी चालवली आणि त्यासाठी त्याला दंड झाल्याचे वृत्त समोर आले होते.मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रोहित शर्माने त्याची लेम्बोर्गिनी उरुस कार २१५ किमीच्या वेगाने चालवली.या मार्गावर वेगाची मर्यादा १०० किमी इतकी आहे. रोहित गाडी वेगाने चालवल्या प्रकरणी आणि नियम मोडल्याप्रकरणी पावती करण्यात आली.आता पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितला दोन दंड करण्यात आले आहेत. पहिली पावती मुंबईहून पु्याला जाताना कामशेत बोगद्याच्या जवळ तर तर दुसरी पावती तळेगाव टोल नाक्याच्या जवळ करण्यात आली. कामशेत येथे रोहितच्या गाडीचा वेग ११७ किमी इतका होता. तर तळेगाव येथे १११ किमी इतका वेग होता. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वेगाची मर्यादा १०० इतकी आहे.हायवे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ऑक्टोबर रोजी त्यांच्या सिस्टमवर दोन फोटोसह प्रत्येकी दोन हजार रुपयांची पावती तयार झाली आहे. हायवे पोलिस पीएसआय अमोल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माकडून १९ ऑक्टोबर रोजी दंडाची रक्कम भरण्यात आली आहे.