• Fri. Jun 20th, 2025

महात्मा बसवेश्‍वरांविषयी अपशब्द वापरल्याबद्दल लिंगायत महासंघाकडून जितेंद्र आव्हाडांचा निषेध

Byjantaadmin

Oct 18, 2023

महात्मा बसवेश्‍वरांविषयी अपशब्द वापरल्याबद्दल लिंगायत महासंघाकडून जितेंद्र आव्हाडांचा निषेध

लातूर ः लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान व बाराव्या शतकातील महान समाजसुधारक जगद्ज्योती महात्मा बसवेश्‍वरांबद्दल आ.जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द काढले आहेत. त्याचा लिंगायत महासंघाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी सांगितले.
बाराव्या शतकातील कर्मठ कालखंडात लोकशाहीची बीजे ज्यांनी रोवली. अनुभवमंटपासारखी संस्था स्थापन करून सर्वांना त्यात प्रवेश दिला. तळागाळातील माणसाच्या गळ्यातील ताईत बनलेल्या महात्मा बसवेश्‍वरांनी बाराव्या शतकात समता, बंधूता, न्याय व कायक या तत्वाचा प्रत्यक्ष अमल केला. सर्वांना समान वागणुकीचा मार्ग दाखविला. क्षुद्र, अतिशुद्रांना देव आणि धर्माचा पर्याय दिला. मृतअवस्थेतल्या समाजव्यवस्थेला जीवंत करण्याचे काम केले. लाखो लोकांना लिहिते-बोलते केले. त्यांना जगण्याचे बळ दिले. अशा हिंमतवान महात्मा बसवेश्‍वरांबद्दल आ.जितेंद्र आव्हाडांनी महात्मा बसवेश्‍वरांनी आत्महत्या केली असे आवमानकारक उद्गार काढले व त्यांनी समस्त लिंगायत समाजाच्या व बसवप्रेमी समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केले. त्यांना इतिहास माहित नसलेल्या विषयात बोलण्याची गरज काय होती? असा प्रश्‍न प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी जितेंद्र आव्हाड यांना विचारला आहे. महात्मा बसवेश्‍वरांचे 1167 साली कुडलसंगम येथे महापरिनिर्वाण झाले. मात्र जितेंद्र आव्हाडांनी बसवेश्‍वरांबद्दल नको तो शोध लावून महात्मा बसवेश्‍वरांसकट समाजबांधवांचाही अपमान केला आहे. या अपमानाबद्दल समाज जितेंद्र आव्हाडांना माफ करणार नाही. त्यांच्या या वक्तव्याची त्यांच्या पक्षध्यक्षांनी गंभीर दखल घेवून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी लिंगायत महासंघाच्यावतीने करण्यात येत आहे तसेच लिंगायत महासंघाच्यावतीने महाराष्ट्रभर या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *