चिपळूण : Mumbai Goa Expressway Bridge Collapse in Chiplun मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत चिपळुणात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या कामाला आता कुठे वेग येत होता. अशातच सोमवारी सकाळी ८.३० वाजता अचानक पुलाच्या मध्यवर्ती भागातील दोन गर्डर तुटले. यावेळी जोरदार आवाज झाला. त्यामुळे परिसरातील व्यापारी व नागरिक भयभीत झाले. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणा देखील हबकून गेली आहे. पावसाळ्यापूर्वी चौपदरीकरणातील किमान एकेरी वाहतूक सुरु करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले.
मात्र या कामी तितकेसे यश आले नाही. अजूनही एकेरी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. परंतु गेल्या महिनाभरात चिपळूण हद्दीत कामाचा वेग वाढला होता. विशेषतः शहरातील बहाद्दूरशेख नाक्यातील उड्डाण पुलाच्या कामाला चांगली गती मिळाली होती. सुरुवातीला शहरातून जाणारा १.८५ किलोमीटर अंतराचा हा उड्डाण पूल उभारताना अनेक अडचणींना सामना करावा लागला. या पुलांतर्गत एकूण ४६ पिलर उभारल्यानंतर तात्काळ गर्डर चढविण्याचे काम सुरू केले आहे. वाशिष्ठी पुलापासून बहादूरशेख नाका दरम्यानचे गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर नुकतेच अतिशय मुख्य नाक्यातील अवघड टप्प्यात काम सुरु केले होते.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत चिपळुणात काम सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या पाचव्या पिलरच्या ठिकाणी असलेले गर्डर आज सोमवारी सकाळी खचले. त्यामुळे परिसरात जोरदार आवाजही झाला. यावेळी नागरिकांची पळापळ झाली. तूर्तास या पुलाचे काम थांबविण्यात आले आहे. (viral video) pic.twitter.com/aVjTDNfpGt
— Amit Joshi (@amitjoshitrek) October 16, 2023