• Sat. Jun 21st, 2025

भाजपवाले देश बिघडवत आहेत, आपण लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्र आणि देश बिघडवण्यापासून वाचवू – उद्धव ठाकरे

Byjantaadmin

Oct 16, 2023

मुंबई: आजपासून आपण एकत्र आलो आहोत. समाजवादी आणि शिवसेना या दोघांची ताकद मोठी आहे. समाजवाद्यांकडे विचार आहेत, केडर आहे. तर डर कशाला? आपण मिळून यांना हरवू शकतो. माझ्यासोबत आलात, पश्चातापाची वेळ येणार नाही. असं हितगुज उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आमदार कपिल पाटील यांनी मुंबईत आयोजित केलेल्या समाजवादी जनता परिवार बैठकीत ते बोलत होते.

Uddhav Thackeray

 

उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले, स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आणीबाणी विरोधी संघर्ष यात समाजवादी आघाडीवर होते. संघ यात कुठे होता? फोडाफोडी करण्यात मात्र संघाचा हात असतो. समाजवाद्यांनी देश घडवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. आता पुन्हा भाजपवाले देश बिघडवत आहेत. आपण लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्र आणि देश बिघडवण्यापासून वाचवू.

बैठकीच्या सुरुवातीला भूमिका मांडताना कपिल पाटील म्हणाले, समाजवादी जनता परिवारातील वेगवेगळे गट, संस्था, संघटना आणि पक्षांचे कार्यकर्ते पुण्यात 24 ऑगस्ट रोजी एकत्र आलो होते. अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला. या बैठकीत समाजवादी जनता परिवाराने एक गट म्हणून काम करायचे. नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली INDIA ला समर्थन देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील INDIA गठबंधन अर्थात महाविकास आघाडीला बळ देण्याचे ठराव केले. प्रबोधनकार ठाकरे यांचे समाजवादी नेत्यांशी वैचारिक नाते होते. ते मैत्र्य व संबंध मतभेद होऊनही बाळासाहेब ठाकरे यांनी जपले. उद्धव जी महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आहात. देश वाचवण्यासाठी समाजवादी आजपासून आपल्यासोबत आहे.शिवसेना खासदार संजय राऊत भाषणात म्हणाले, समाजवादी चळवळीने साने गुरुजी, सेनापती बापट, एस. एम. जोशी, मधू दंडवते, मृणालताई गोरे यांसारखे मोठे नेते दिले. मी पहिल्यांदा राज्यसभेत गेलो तेव्हा बिहारचे एक खासदार मला नमस्कार करून म्हणाले, मधू लिमये यांच्या महाराष्ट्रातले तुम्ही आहात म्हणून तुम्हाला सलाम. राऊत पुढे म्हणाले, समाजवादी मधू लिमये यांनी महाराष्ट्राचं नाव रोशन केलं. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लोकसभा – राज्यसभेत समाजवादी खासदार कमी आहेत, त्यामुळे सभागृह अळणी वाटते.आमदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील २१ हून अधिक समाजवादी जनता परिवारातील राजकीय पक्ष, जनसंघटना एक केल्यात. पुण्यात पहिली बैठक झाली होती. आजची दुसरी बैठक होती. या बैठकीत मंचावर शिवसेना खासदार संजय राऊत, माजी मंत्री अनिल परब, समाजवादी नेते डॉ. अभिजीत वैद्य, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, मलविंदरसिंह खुराणा, सच्चिदानंद शेट्टी, जदयू महाराष्ट्र अध्यक्ष शशांक राव, कार्याध्यक्ष अतुल देशमुख, मिलिंद नार्वेकर, मुस्लिम ओबीसी नेते शब्बीर अंसारी, जेडीएसचे प्रभाकर नारकर, आरजेडीचे विजय खंदारे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, मधू बिरमोळे, मुक्ता कदम हे उपस्थित होते. एमआयजी क्लब, बांद्रा येथे झालेल्या या बैठकीला राज्यभरातून समाजवादी जनता परिवारातील राजकीय पक्ष, जनसंघटना यांचे प्रमुख पदाधिकारी आले होते. विचारवंत, लेखक, कवी, पत्रकार यांचीही उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *