विमान prawas करण्याचा बेत आखत असाल तर थोडं थांबा. ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नाहीतर विमानतळावर जाल आणि हात हलवत परत याल. एक तर तुमचा वेळ जाईल आणि नाहक मनस्ताप सहन करावा लागेल. छत्रपती शिाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 17 ऑक्टोबर रोजी सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात एकही विमान हवाईपट्टीवरून उड्डाण घेणार नाही. किंवा कोणत्याही विमानाचं लँडिंग होणार नाही. म्हणजे एका अर्थाने सहा तासांसाठी विमानांचाही मेगा ब्लॉक होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना 17 ऑक्टोबर रोजी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई विमानतळावर दोन्ही रनवेवर दुरुस्ती आणि देखभालीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विमानतळावरील उड्डाण बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना संध्याकाळी 5 नंतरच प्रवास करता येणार आहे. तसेच काही सकाळी 10 वाजेच्या आतही प्रवास करता येणार आहे. मात्र, मधल्या काळात विमानसेवा सहा तासासाठी बंद राहणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
मेंटेनन्ससाठी बंद राहणार
नुकताच पावसाळा संपला आहे. मुंबईत या वर्षी 400 मिमी पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी हवाईपट्टी खराब होण्याची शक्यता आहे. तसेच हवाईपट्टीची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळे हवाईपट्टीची दुरुस्ती आणि पाहणी करण्यासाठी विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रनवेचं मेंटेनन्स ठेवण्यासाठीच विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. या मेंटेनन्ससाठी एअर लाईन्स आणि संबंधितांना सहा महिन्यांपूर्वीच नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता हे काम हाती घेण्यात येणार असल्याचं विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आलं.मुंबई विमानतळावर दोन एक दुसऱ्यांना जोडणारे रनवे आहेत. मुख्य रनवे 9/27 आणि द्वितीय रनवे 14/32 आहे. मुंबई विमानतळावर रोज 900 फ्लाईटचे लँडिंग आणि उड्डाण होत असते. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतरचं मुंबई विमानतळ हे दुसरं सर्वाधिक विमानसेवा देणारं विमानतळ आहे. त्यामुळे या विमानतळांच्या हवाईपट्टीवर वरचेवर निरीक्षण करणं महत्त्वाचं असतं. तेच काम येत्या 17 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.