या महिनाअखेरपर्यंत एक लाख पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. ही पद्धत एकीकडे सरकारचे पैसे वाचविणारी असली तरी या पद्धतीने होणारी नोकरभरती ही आपल्या आरक्षणाच्या मागणीमधील खोडा आहे. अशी नोकरभरती होत राहिली तर आरक्षणाच्या लढ्याची निष्पत्ती म्हणून आपल्या हातात काय राहणार, याचा सत्ताधाऱ्यांना आपण जाब विचारला पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे नेते खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी येथील कर्मवीर पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला. या वेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष सागर पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.खासदार डाॅ. अमोल कोल्हे म्हणाले, गेली चाळीस वर्षे मराठा समाज त्याच्या न्याय हक्काच्या प्रतीक्षेत आहे. युद्धात जिंकलो अन् तहात हरलो ही परिस्थिती गेल्या काही वर्षांत मराठा समाजाची होत आहे. जगाने दखल घेतली असे मोर्चे मराठा समाजाने काढले, पण पदरात काय पडले? कोणाच्या ताटातील ओढून नको, आम्हाला आमच्या न्याय हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. ही मराठा समाजाची मागणी अतिशय योग्य आहे. समाजासमाजात तेढ निर्माण न करता प्रत्येक समाजाने मराठा समाजाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. डाॅ. अमोल कोल्हे म्हणाले, इंडिया आघाडीची महत्त्वाची मागणी आहे ती जातीनिहाय जनगणनेची. जातीनिहाय जनगणना झाली तर प्रत्येक समाज किती आहे ते समोर येईल.
त्यासाठी प्रत्येकाने निवडणुका घ्यायच्या असतील तर जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडे करण्याची आवश्यकता आहे. ही माहिती जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत केंद्र सरकारकडून आरक्षणाची मर्यादा वाढविली जाणार नाही.
दिल्लीबाबतचा निर्णय जसा संविधान दुरुस्ती करून घेण्यात आला. तसा निर्णय संविधान दुरुस्ती करून मराठा आरक्षणाबाबत का घेतला जात नाही? हा प्रश्न मांडला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व वैयक्तिक माझा मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी कायम पाठिंबा राहील. आज या आंदोलनात खडकी, इंजबाव, शंभुखेड, खुटबाव गावांतील सकल मराठा समाज ठिय्या आंदोलनात सहभागी झाला होता.