जिल्हा बँकेचा नावलौकिक आणखी वाढवू बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांचा विश्वास
एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
लातूर -. सहकारमहर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची आर्थिक शिस्त व काटेकोर व्यवस्थापन यामुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा राज्यात नावलौकिक आहे. यापुढेही ही शिस्त, हे व्यवस्थापन असेच कायम ठेवत, शेतकरी सभासदांचा विश्वास वृद्धिंगत करत आम्ही बँकेचा नावलौकिक आणखी वाढवू, असे प्रतिपादन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी येथे केले.
ते लातूर येथील राजर्षी शाहू कॉलेज एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या ४७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहून आमदार श्री. धिरज देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी गोपाळ शिंदे, गीतांजली पाटील, शिवाजीराव सूर्यवंशी, राजेश जाधव, महादेव मुळे, महादेव गव्हाणे, विजय देशमुख, किरण जाधव, अनुजा जाधव, मिलिंद सोनकांबळे, सुधीर जाधव, संभाजी पाटील, पल्लवी पाटील, विजय दळवी, व्यंकट धुमाळ, कल्याण सावंत, मुरलीधर जाधव, सुदर्शन पाटील, गोविंद धुमाळ, सुशांत टेकाळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, उत्पन्नाची कायम शाश्वती नसलेल्या शेती क्षेत्राला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मोठ्या प्रमाणात बिनव्याजी कर्ज देते. तसेच, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज आणि मुलीच्या लग्नासाठी कर्ज देते. पगारदारांनाही पतपुरवठा करते. त्या कर्जाचा परतावाही ९९ टक्के केला जातो. लोकहिताचे अनेक निर्णय जिल्हा बँकेने घेतले असून हे काम नियमितपणे सुरु आहे. त्याचे कारण आपल्या नेत्यांनी घालून दिलेली आर्थिक शिस्त व काटेकोर व्यवस्थापन हे आहे.
राजर्षी शाहू कॉलेज एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी ही पतसंस्था स्वावलंबी व सक्षम पतसंस्था म्हणून ओळखली जाते. सभासदांच्या गरजेनुसार कमी व्याजदरात पतपुरवठा करीत सभासदांचे हित जोपासण्याचे काम ही संस्था करत आहे. याचा आनंद आहे, अशी भावनाही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी व्यक्त केली.
जिल्हा बँकेची डिजिटल सुविधा देवू
लातूर जिल्हा बँक ग्राहककेंद्री राहून सभासदांना सुलभ पतपुरवठा, गावातच सर्व बँकींग सुविधा, डिजिटल सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकरी सभासद, पगारदार संस्था यांच्या ठेवी, पतपुरवठा यातून जिल्हा बँकेचा व्यवसाय १० हजार कोटींच्या पुढे नेण्याचा आमचा मानस आहे. शेती आणि शेतकऱ्यांबरोबरच पगारदारांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेवू, असेही आमदार श्री. धिरज देशमुख यानी यावेळी बोलताना सांगितले.