महायुती सरकारचा शेवटचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी, यासाठी काहींनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अशातच बबनराव लोणीकरांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. “मी मंत्री होणार की नाही हे देव आणि देवेंद्र यांच्या हातात आहे,” असे भाजप नेते, माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले. परभणीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याने बबनराव लोणीकरांनी इच्छा व्यक्त केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपकडून चार वेळेस विधानसभेवर निवडून आलेले आणि ग्रामीण भागात तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे असणारे लोणीकर राजकीय, सामाजिक कार्यक्रमांसोबतच हरिनाम सप्ताह असो, की अन्य धार्मिक कार्यक्रम असो, त्यामध्ये उत्साहाने सहभागी होत असतात. आपल्या वादग्रस्त विधानामुळे लोणीकर अनेक वेळा अडचणीत आले आहेत.
राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासंदर्भातील चर्चा सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्रीdevendra fadnvis यांनी दोन दिवसांपूर्वी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकर होणार असल्याने शिंदे गट आणि अपक्षांमधील वाढत चाललेली धुसफूस लवकरच थांबण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार bacchu kadu यांनी मंत्रिपदावरील दावा सोडला आहे. यावर काल (रविवारी) त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, “मला मंत्री व्हायचं नाही, मला मंत्री केले तरी होणार नाही. जास्तच आग्रह केला तर प्रहारतर्फे राजकुमार पटेल यांना मंत्री करू,” असे बच्चू कडू म्हणाले.
तिघांपैकी एकाला मंत्रिपद मिळावे…
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काल (रविवारी) मंत्रिपदासाठी तीन जणांची नावे सुचवली आहेत “भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मला वाटले, की आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यात गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, किसन कथोरे यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळावं, अशी आमच्या सर्वांचीच भूमिका आहे,” असे ते म्हणाले.