मुंबईत प्रवेश देणाऱ्या पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांच्या दरात आजपासून वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता मुंबईत जाणाऱ्यांना आणि मुंबईतून बाहेर पडणाऱ्यांना आणखी थोडा खिसा रिकामा करावा लागणार आहे. कारण आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबईत प्रवेश देणाऱ्या पाचही टोलनाक्यांच्या दरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विभागाच्या २००२ सालच्या अधिसूचनेत दर तीन वर्षांनी टोल वाढीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानुसारच ही टोल वाढ करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं आता या टोलवाढीच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय असेल नवा टोलचा दर?
यापूर्वी चारचाकी वाहनांना ४० रुपये टोल भरावा लागत होता. आता तो ४५ रुपये करण्यात आला आहे. मिनी बसला मुंबईत प्रवेश करण्यासाठी ६५ रुपये मोजावे लागतील. ट्रकसाठी १३० रुपये, अवजड वाहनांसाठी १६० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. तसेच छोटी वाहनांसाठी ४५ रुपये, मध्यम आणि अवजड वाहनांसाठी ७५ रुपये, ट्रक आणि बसेससाठी १५० रुपये आणि अवजड वाहनांसाठी १९० रुपयांपर्यंत टोल वाढ करण्यात आली आहे. या टोलवाढीमुळं सामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दररोज मुंबईत ये-जा करणाऱ्यांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे.
मुंबईतील कोणत्या नाक्यांवर वाढणार टोल?
मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग, एलबीएस मार्ग, सायन-पनवेल महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि ऐरोली उड्डाणपूल कॉरिडोअर या पाच एन्ट्री पॉईंट्सवरील टोल वाढ करण्यात आली आहे. या नाक्यांवर नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होत असते. नाक्यांवरील वाहतुकीमुळं मोठ्या प्रमाणात इंधन आणि वेळेचा अपव्यय होत असतो. त्यामुळं मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंट्सवरील टोल माफ करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती.