पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच तयारीला सुरु केली आहे. सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पुण्यात होणार आहे. त्याचसोबत लोकसभेची जागा पुन्हा काबीज करण्यासाठी दोन नेत्यांच्या उमेदवारीची चर्चा काँग्रेसच्या गोटात दबक्या आवाजात सुरू आहे. ८ ऑक्टोबरला होणाऱ्या या बैठकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार सत्यजित पाटील, आमदार प्रणिती शिंदे सोबत इतर नेते उपस्थित असणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील होण्यापूर्वी पुण्यातली लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी पक्षा दावा ठोकत लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या कलगीतुरा रंगला होता. मात्र, आता काँग्रेससाठी जागा मोकळी झाली असेच चित्र पाहायला मिळत आहे. पुणे लोकसभेसाठी सध्याच्या घडीला काँग्रेसची दोन नाव पक्षातील गोटात सर्वधिक चर्चेत आहेत. ती म्हणजे काँग्रेसचे आक्रमक शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, आणि भाजपचा कसब्याचा बालेकिल्ला सर करत जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर. या दोघांपैकी एकाला पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळेल, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
अरविंद शिंदे हे सध्या तरी पुणे शहर अध्यक्ष आहेत. आक्रमक शहर अध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे. त्यासोबत सर्वधिक पुण्यातले नगरसेवक त्यांच्या नातेसंबंधांमध्ये आहेत. माजी नगरसेवक असताना महापालिकामध्ये आक्रमकपणे विरोध करून आपली बाजू मांडण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे बालेकिल्ला सर करत जायंट किलर ठरलेले आमदार रवींद्र धंगेकर हे ही सर्वाधिक चर्चेत आहेत. कसबा मतदारसंघा विजय झाल्यानंतर आमदार धंगेकरांचं विजयाचं वारं अजूनही कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा झाली होती. त्यादरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधात लढण्यासाठी दंड थोपटले होते.२०१९च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे १३ आमदार फोडून त्यांना भाजपमध्ये आणले होते. त्यानंतर काँग्रेसला मोठी गळती लागली होती. नेत्यांसोबत काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते ही इतर पक्षात प्रवेश करत आहे. ही गळती अद्याप ही थांबली नसून शहरातल्या उपनगरातले कार्यकर्ते शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे. याचा मोठा फटका येणाऱ्या निवडणुकांमध्ये बसू शकतो. त्यामुळे पक्ष बळकट करण्यासाठी शहरातल्या असंख्य कार्यकर्ते त्या दिवशी काँग्रेस भावनात पाहायला मिळणार आहे.