अहमदनगर : जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास सर्वच घटकांकडून पाठिंबा मिळत आहे. रविवारी तालुक्यातील हळगाव येथे लग्न झालेले नवदाम्पत्य लग्न मंडपातून थेट उपोषण मंडपात येऊन बसले. समाजातर्फे सुरू असलेल्या उपोषणास आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.धनगर आरक्षणप्रश्नी जामखेड चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने गेल्या १३ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला विविध संघटना पदाधिकारी पाठिंबा देत आहेत. १७ सप्टेंबरला तालुक्यातील हळगाव येथे हरिश्चंद्र खरात या तरुणाचा प्रतीक्षा होमले यांच्याशी विवाह झाला. गावातील खरात वस्ती येथे दुपारी विवाह झाला. त्यानंतर लगेच हे जोडपे चौंडीला आले. तेथे त्यांनी सुरू असलेल्या उपोषणात काही काळ भाग घेत आपला पाठिंबा व्यक्त केला. आमच्यासाठी विवाह सोहळा हा महत्वाचा आहेच, पण समाजासाठी आरक्षणही तेवढेच महत्वाचे आहे, त्यामुळे पाठिंबा देण्यासाठी येथे आलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने हे उपोषण सुरू आहे. बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर व सुरेश बंडगर आदी उपोषणाला बसले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सरकारच्यावतीने केलेली मध्यस्थी अयशस्वी झाली. त्यामुळे आंदोलन सुरूच राहिले.रविवारी राज्यभरातून कार्यकर्ते चौंडीत आले होते. या बैठकीत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. यशवंत सेनेच्या बी के कोकरे यांनी धनगर आरक्षणाची ज्योत पेटवली त्याच घाटात खंडाळा घाटात पेटवलेल्या ज्योतीचे वणव्यामध्ये रुपांतर होणार आहे. याच अनुषंगाने येणाऱ्या २० तारखेला खंबाटकी घाट (ता. खंडाळा जिल्हा सातारा) या ठिकाणी महाराष्ट्रातील धनगर बांधवांच्या वतीने भव्य रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
धनगर समाजातील सर्व आजी ,माजी आमदार व सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची राज्यव्यापी बैठक आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी चोंडीत आयोजित केली होती. यावेळी दोडतले म्हणाले, ही लढाई फक्त यशवंत सेनेची नाही. हे आंदोलन धनगर समाजाच्या येणार्या पुढील पिढीसाठी आहे. ही लढाई समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक हितासाठी आहे. चौंडी येथिल पवित्र ठिकाणी असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी हे उपोषण सुरू आहे. हा देश घटनेवर चालत असेल तर ४७ जातींना अदिवासींची सवलत मिळते मग धनगर समाजाला का मिळत नाही.