कोल्हापूर: मराठा आरक्षण केवळ केंद्र सरकारच देऊ शकते यासाठी राज्य सरकारने पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तसेच मोदी यांना राज्य सरकारने विषय समजावून सांगितला पाहिजे. घटनादुरुस्ती झाल्याशिवाय हा विषय सुटणार नाही, असे मत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केले आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
सध्या राज्यात मराठा आरक्षणचा मुद्दा तापला असून राज्यभर आंदोलने सुरू आहेत. शिवाय जालना येठील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनीही उपोषण सोडण्यास तयार नसल्याने दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत जात आहे. या संदर्भात आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांनी आता आपले मत व्यक्त केले असून आरक्षणाचा प्रश्न राज्यापेक्षा दिल्लीत सोडवला पाहिजे. केंद्रात आणि राज्यात सध्या भाजपचे सत्ता आहे यामुळे हा प्रश्न सुटू शकतो आणि हा प्रश्न केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच सोडवू शकतात. राज्य सरकारने पंतप्रधानांना विषय समजावून सांगून आणि विनंती करून हा विषय संपवला पाहिजे.
केंद्रात सध्या त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांच्याकडे ती ताकद आहे ते घटनादुरुस्ती करून घेऊ शकतात. जर ५०% ची मर्यादा वाढवल्यास ओबीसीतून आरक्षण वैगरे हे वाद राहणार नाहीत, असे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटले आहे. तसेच सध्या तरी केंद्रात आणि राज्यात एकच सरकार आहे पुढे एक वर्षानंतर निवडणुका झाल्यानंतर काय होईल हे सांगता येनार नाही.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारने यापूर्वीच लक्ष द्यायला पाहिजे होत
मनोज जरंगे पाटील यांचा जीव वाचवणे सरकारला अत्यंत गरजेचे आहे. सर्वात आधी तो वाचवण्यासाठी सरकारन प्रयत्न करणे महत्वाचे आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकारने यापूर्वीच लक्ष द्यायला पाहिजे होते. सरकारने लक्ष दिले नसल्याने आंदोलकांवर लाठीमार झाला आणि त्यामुळेच विषय चिघळला आहे, असे ही शाहू महाराजांनी यावेळी म्हटले आहे.
उपोषण करून हा प्रश्न सुटणार नाही
शिवाय कोल्हापुरातील सकल मराठा समाजाकडून ही जर गणपती पूर्वी मार्ग निघाला नाही तर २ ऑक्टोबरपासून उपोषणास बसण्याचा इशारा दिला असून याबाबत ही शाहू महाराज भाष्य केले असून पाठिंबा वगरे ठीक आहे, मात्र अशा पध्दतीने उपोषण करून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाली तर त्यांनी कायदा बदलून हे करू शकतात, असे शाहू महाराज छत्रपती म्हणाले आहेत.