• Sat. Jun 21st, 2025

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मनोविकृती शास्त्र विभागातर्फे जागतिक आत्महत्या दिन साजरा 

Byjantaadmin

Sep 10, 2023

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मनोविकृती शास्त्र विभागातर्फे जागतिक आत्महत्या दिन साजरा

लातूर :  दरवर्षी  १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील  मनोविकृती शास्त्र विभागातर्फे जागतिक आत्महत्या दिन साजरा करण्यात आला.
गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक आजार, आर्थिक ताणतणाव, नातेसंबंधातील ताण तणाव, व्यसनाधीनता यामुळे भारतातील आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे. दर एक लाख लोकसंख्येमागे बारा असे हे प्रमाण भारतामध्ये दिसते. दुर्दैवाने आत्महत्याच्या संख्येमध्ये देशात महाराष्ट्र सगळ्यात आघाडीवर आहे. वय वर्षे १५ ते ४५ या वयोगटांमध्ये आत्महत्येने जीव गमावणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येते. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना व मानसोपचार तज्ञ संघटना यांच्यातर्फे आत्महत्येचा प्रतिबंध करता यावा तसेच याबद्दल जनजागृती व्हावी व ताणतणावातून जाणाऱ्या व्यक्तींना योग्य ती मदत मिळावी यासाठी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस दरवर्षी १०सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील मनोविकृती शास्त्र विभागातर्फे महाविद्यालयातील अध्यापक, पदवी पूर्व व पदव्यूत्तर विद्यार्थी, नर्सिंग विद्यार्थी व कर्मचारी यांच्यासाठी प्रबोधन सत्र घेण्यात आले.
 याप्रसंगी  बोलताना अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी सांगितले की,  मानसिक आरोग्य हा आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याचा विषय असला पाहिजे.  कारण मानसिक आरोग्याशिवाय परिपूर्ण आरोग्याची व्याख्या करता येत नाही. याप्रसंगी मनोविकृतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. आशिष चेपुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एखादी व्यक्ती आयुष्याच्या अवघड वळणावरून जाताना तिच्यामध्ये काही जोखमीचे घटक व धोक्याची लक्षणे दिसत असतील तर त्या व्यक्तीला कसे ओळखावे व अशा नाजूक वेळी तिला भावनिक व मानसिक आधार कसा देता येईल याबद्दल त्यांनी सांगितले. आयुष्यातील अडचणींना तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण त्या व्यक्तीचे संरक्षक मित्र  बनून त्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करू शकतो. लक्षणांची तीव्रता ओळखून वेळोवेळी मानसोपचार तज्ञांची मदत कशी घ्यावी व त्यासाठी औषधोपचार, समुपदेशन व इतर उपाययोजना काय करता येतील याबद्दल त्यांनी माहिती दिली. आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये जर नैराश्य, आयुष्याबद्दल नकारात्मकपणा, एकटेपणा दिसत असेल किंवा ती व्यक्ती स्वतःच्या मनातील आत्महत्येबद्दलचे विचार बोलून दाखवत असेल तर त्वरित वैद्यकीय मदत मिळवावी. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आजूबाजूला तीक्ष्णवस्तू, विषारी पदार्थ, औषधे, दोरी इत्यादी नाही ना याची खात्री करून त्या व्यक्तीला एकटे सोडू नये. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने खास वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या संवाद (१४४९९) नावाच्या हेल्पलाइन बद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच केंद्र व राज्य शासनातर्फे चालवण्यात येणाऱ्या टेली मानस प्रकल्पाबद्दल देखील त्यांनी उपस्थित त्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचा समारोप   सुरेंद्र सूर्यवंशी यांनी केला.
याप्रसंगी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. महादेव बनसुडे, डॉ. साबळे डॉ. ननावरे, डॉ. अरविंद कराड, डॉ. साधना नागरगोजे डॉ. गोविंद मुंडे, डॉ. अंशू कुमारी, डॉ. अमित शर्मा, डॉ. तुषार पाटील, डॉ. अक्षय लामदडे,   नवनाथ रुपनर,  इंगळे, नर्सिंग महाविद्यालयाचे अध्यापक यांची उपस्थिती होती. तसेच जागतिक आत्महत्या प्रतिबंधक आठवडा साजरा करत असताना सामान्य जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आत्महत्या प्रतिबंध या विषयावर पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच विविध ठिकाणी पथनाट्य याचे सुद्धा आयोजन मानसोपचार शास्त्र विभागातर्फे करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *