• Sat. Jun 21st, 2025

विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी, समस्या शिक्षकांच्या  कानावर घालून सोडवणूक करून घ्यावी : न्या. अवसेकर

Byjantaadmin

Sep 10, 2023

विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी, समस्या शिक्षकांच्या  कानावर घालून सोडवणूक करून घ्यावी : न्या. अवसेकर
लातूर : शालेय जीवनात वावरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही शंका न आणता त्या आपल्या गुरुजनांच्या , शिक्षकांच्या कानावर घालून त्याची सोडवणूक करून घ्यावी असे प्रतिपादन लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. श्रीमती एस.डी. अवसेकर यांनी केले.  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि श्रीकिशन सोमाणी विद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकिशन सोमाणी विद्यालयात शनिवार. दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी ‘ बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ या कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी न्या. अवसेकर बोलत होत्या. यावेळी संस्थेचे सचिव कमलकिशोर अग्रवाल, एड. सुमेधा शिंदे, एड. ए.जे. तिवारी, एड. अंजली जोशी, एड. जी.जे. मिटकरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत स्वामी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी कमलकिशोर अग्रवाल यांच्या हस्ते न्या. अवसेकर यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने अन्य प्रमुख अतिथींचाही सन्मान करण्यात आला. न्या. अवसेकर यांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ विषयी सविस्तर अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपली कोणतीही अडचण, समस्या तात्काळ शिक्षकांच्या कानावर घातल्यास त्याची सोडवणूक विनाविलंब करणे शक्य होऊ शकते असे सांगितले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञानाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा,असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात एड. सुमेधा शिंदे, एड. ए.जे. तिवारी, एड. अंजली जोशी, एड. जी.जे. मिटकरी यांनीही विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांनी केले. प्रास्तविकात त्यांनी आपल्या विद्यालयात विद्यार्थ्यांना अध्ययनासोबतच इतर विषयांतही पारंगत करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्या कलागुणांना विकसित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती गोवंडे यांनी तर आभार प्रदर्शन दर्शन देशपांडे यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, राहुल पांचाळ, सुनीता जाधव यासह सर्व शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, शालेय समितीचे अध्यक्ष अतुल देऊळगावकर, कोषाध्यक्ष जयेश बजाज यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *