औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार आणि मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, या घटनेचे औरंगाबाद जिल्ह्यात देखील पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणजे, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर आजपासून तीन दिवस साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, तीन दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास त्याच ठिकाणी बेमुदत उपोषण हे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण आता गावागावात पाहायला मिळत आहे. गंगापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत समोर आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण केले जात आहे. या उपोषणात गावातील तरुण, वृद्ध आणि महिला सहभागी होताना पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण थांबून त्याच ठिकाणी अमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देखील गावकऱ्यांनी दिला आहे.
उपोषणकर्त्यांच्या मागण्या
- जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करत असलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करून जखमी केले. त्याचा गंगापूर सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात येऊन याप्रकरणी गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत. तसेच, आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सक्तीच्या रजेवर पाठवण्याऐवजी तात्काळ निलंबणाची कारवाई करण्यात यावी.
- मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी केंद्रात आणि राज्यात भाजप आघाडीचेच सरकार असल्याने संसदेत अध्यादेश काढून निर्णय घेण्यात यावा. सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याचे कारण सांगून समाजाची फसवणूक करू नये.
- मराठा समाजातील युवकांवर गंगापूर तालुक्यातील कायगाव आंदोलनासह, आंतरवली सराटी आणि राज्यात इतर ठिकाणी दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.