संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि हे सर्व गृहविभागाचे अपयश आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवर विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दात टीका केली.जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये वाद झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची स्थिती आहे. घटनास्थळी दगडांचा खचही असल्याचे दिसून आले आहे. उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या लाठी हल्ल्याचा निषेध केला आहे.
हे गृह विभागाचे अपयश
सदरील घटना हे गृह विभागाचे अपयश आहे. या घटनेची जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मराठा समाजाचे आंदोलन शांततेच सुरू होते. आंदोलनाला पाठिंबा वाढत होता. त्यामुळे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने बळाचा वापर केला असल्याचा आरोप देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
आरक्षण देण्याची सरकारची माणसिकता नाही
सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे. गेल्या वर्षभरापासून सरकार केवळ फोडाफोडीचे राजकारण करण्यात व्यस्त आहे. या नादात सरकारचे मराठा समाजाकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची माणसिकताच नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.