2024 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव अटळ असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. ते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.देशातील 60 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक इथे बसले आहेत. कॉर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर जागा वाटपाबाबत समिती नेमली आहे. इंडिया आघाडीसाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे, असे राहुल गांधी म्हणाले
शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करणार
इंडिया आघाडी देशातील 60 टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करते. आमच्या व्यासपीठावरून हे स्पष्ट होते. विरोधकांचे आजचे चित्र पाहून भाजपचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचे स्पष्ट होते. भाजपचा आता कोणत्याही स्थितीत विजय शक्य नाही. या प्रकरणी आम्ही समन्वय समिती स्थापन केली आहे, असे राहुल गांधी म्हणाले. भाजप सरकार गरीबांचे पैसे उद्योगपतींना देत आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करणार आहोत. इंडिया आघाडी भाजपला हरवणार असल्याचा विश्वास देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
निवडणूक जिंकणे अशक्य
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, इंडिया आघाडीच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेतले आहेत. आम्ही सर्व एकत्र आल्याने भाजपला निवडणूक जिंकणे अशक्य आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे ही बैठक आयोजित केल्याबद्दल राहुल गांधी यांनी त्याचे आभार मानले आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आता यासंबंधित जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच तयार करण्यात येईल. त्यासाठी एक समन्वय समिती निर्माण करण्यात आली आहे.
भाजप हे भ्रष्टाचाराचे घर
राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी शेतकरी, कामगार आणि देशातील गरीब जनतेचा मोठा हात असतो, यांच्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत आहोत. आम्ही इंडियासाठी एकत्र आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हे भ्रष्टाचाराचे घर झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी अदानी यांची चौकशी करायला पाहीजे. त्यांनी चौकशी केली नाही तर मिलिभगत असल्याचे स्पष्ट होईल. देशातील 60 टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक इथं बसले आहेत. त्यामुळे भाजप जिंकू शकत नाही. भाजप गरीबांचे पैसे निवडक लोकांना देते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
उद्योगपतीसाठी काम करणारे सरकार
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, इंडियाच्या मागील दोन बैठकीमध्ये राहुल गांधी, तेजस्वी यादव, शरद पवार, यांच्यासह सर्वच नेत्यांनी बसून एक अजेंडा तयार केला. बेरोजगारी, आणि महागाईविरोधात आपण कसे लढणार आहोत असे म्हणताना पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 रुपये वाढवतात आणि 2 रुपये कमी करतात असा टोला लगावला आहे. मोदी गरीबांसाठी कधीच काम करणार नाही. ते केवळ उद्योगपतीसोबत मिळून काम करत आहे. अदानी यांची संपत्ती कशी वाढली हा याची माहिती देखील राहूल गांधी यांनी दिली याविरोधात लढण्यासाठी आम्ही तयार असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.
आम्ही पवारांच्या सोबत
लालूप्रसाद यादव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटे बोलून आणि अफवा पसरवून सत्तेत आले, आम्ही सगळे फसलो, आता इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी मोदींना सूर्यावरती पाठवावं, त्यांचं नाव जगभर होऊ दे अशी मिश्किल टिप्पणी राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केली. आम्ही घाबरणार नाही, मोदींना सत्तेतून हटवूनच शांत बसणार असा निश्चयही त्यांनी व्यक्त केला.लालूप्रसाद यादव यांनी भाषणाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी लढत राहावे ते जुने नेते आहेत, आम्ही त्यांच्या पाठिशी आहे.लालूप्रसाद यादव यांच्या भाषणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, देशात फक्त काही उद्योगपतींसाठी धोरणे लागू केली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानींची चौकशी करावी. लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली असून त्यावर भाष्ट करावे.