केंद्र सरकार देशात नवा कायदा आणण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं आहे. कारण संसदेचं विशेष अधिवेशन मोदी सरकारकडून बोलवणयात आलं आहे. यात ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. याला विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला आहे. ठाकरे गटाकडून या विधेयकाला कडाडून विरोध केला जात आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला आव्हान दिलंय. मोदी सरकारला हे सगळं आता सुचत आहे. कारण यांच्या आता लक्षात आलं आहे की, आता सगळी राज्य हातातून जातील. एक एक करुन हे निवडणुका हारतील. हे त्यांना चांगलंच माहिती आहे. म्हणून हे सगळं सुरू केलं आहे. हिंमत असेल तर वन नेशन वन इलेक्शन घेऊनच टाका!, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही ‘एक देश, एक निवडणूक’ ला विरोध केला आहे. आमचा विरोध वन नेशन वन इलेक्शनला आहे. लोकांचं लक्ष भरकटवण्याचं काम केलं जात आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. याचा आम्ही निषेध करतोय. भविष्यातही आमचा विरोध कायम राहील, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.
काल आणि आज इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे. 28 पक्ष एकत्र आले आहेत. ही अत्यंत महत्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे. जे आम्हाला शिल्लक सेना म्हणून हिणवत होते. त्यांनी आता बोलायला सुरूवात केली आहे. सगळे पत्रकार परिषद घेत आहेत. भाजप आणि शिंदेगट यांच्या टार्गेटवर फक्त उध्दव ठाकरे आहेत. लेकिन ये डर अच्छा लगा. ये डर होना चाहिए! उध्दव ठाकरे यांच्या ताकदीचा केंद्र आणि राज्य सरकारलाही अंदाज आला आहे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.