राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटीनंतर आता शरद पवार गटाने महत्वाच्या नियुक्त्याची घोषणा करताना बीडच्या सभेत राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या बबन गितेंसह आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
पक्षाने रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी, तर बबन गित्ते यांना राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संधी दिली आहे. रोहिणी खडसे NCP नेत्या विद्या चव्हाण चव्हाण यांची जागा घेतील.
बबन गित्ते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे पवारांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांना ताकद दिल्याचे स्पष्ट होत आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीत वाढलेले तथा पुढे धनंजय आणि पंकजा या दोघांनाही साथ दिलेले गित्ते यांनी वेगळी वाट निवडली. मुंडे बहीण – भावाच्या संपूर्ण खाचखळगे माहिती असलेले गित्ते धनंजय मुंडे यांना भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
बबन गित्ते यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी मोठे शक्ती प्रदर्शन केले. जवळपास एक हजार गाड्यांच्या ताफ्यासह बबन गित्ते सभास्थळी आले. त्यावरून गित्ते यांच्यामागे समर्थकांची मोठी झुंड असल्याचे स्पष्ट झाले. शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांच्याविरोधातील मोहरा म्हणून गित्ते यांना ताकद देणार असल्याचे स्पष्ट झाले होते. याचाच भाग म्हणून त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदरी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडेंचे यांचे नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांबरोबर राजकारण केले. पण पुढे तीव्र मतभेद झाल्याने ते धनुभाऊंच्या सोबतीला गेले. त्यांच्या संगतीनेच गित्तेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकलीही. बबन गित्ते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या. धनुभाऊंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला. तिथेच धनंजय मुंडे आणि गित्ते यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली.
रोहिणी खडसे नेमक्या कोण?
रोहिणी खडसे या महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री, मुक्ताईनगरचे माजी आमदार एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत. रोहिणी खडसे यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे.त्या जळगावमध्ये राहतात त्यांच्या पतीचे नाव प्रांजल खेवलकर आहे.
रोहिणी खडसे यांनी 2019 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला व त्या 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.मात्र, त्यांचा शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला होता. त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष होत्या. आणि सध्या संत मुक्ताई साखर कारखाना , घोडसगाव या कारखान्याची संचालक आहे.