केंद्र सरकारने मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या (14.2 किलो) दरात 200 रुपयांची कपात केली आहे. यासह, आता किंमत दिल्लीत 1103 रुपयांवरून 903 रुपये, भोपाळमध्ये 908 रुपये, जयपूरमध्ये 906 रुपयांवर आली आहे. नवीन किंमत 30 ऑगस्टपासून म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी लागू होईल.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ओणम आणि रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी किंमती कमी करून पंतप्रधान मोदींनी भगिनींना मोठी भेट दिली आहे. देशातील 33 कोटी ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे 2023-24 या आर्थिक वर्षात सरकारवर 7,680 कोटींचा बोजा पडणार आहे. केंद्रीय मंत्री असेही म्हणाले की सरकार 75 लाख नवीन उज्ज्वला कनेक्शनचे वितरण करेल.
यावर्षी 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने यावर्षी 1 एप्रिलपासून बीपीएल कुटुंबांना 500 रुपयांत गॅस देण्याची योजना लागू केली आहे. मध्य प्रदेशातही काँग्रेसने 500 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे.
यापूर्वी मार्चमध्ये दरात बदल झाला होता
मार्च 2023 मध्ये 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर दिल्लीत त्याची किंमत 1103 रुपये झाली होती. यापूर्वी 6 जुलै 2022 रोजी किमती बदलण्यात आल्या होत्या. त्यानंतरही भावात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली.
जून 2020 पासून एलपीजीवर सबसिडी उपलब्ध नाही
जून 2020 पासून बहुतांश लोकांना एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळत नाही. आता उज्ज्वला योजनेंतर्गत ज्यांना सिलिंडर देण्यात आले आहे त्यांनाच 200 रुपये अनुदान मिळते. यासाठी सरकार सुमारे 6,100 कोटी रुपये खर्च करते. जून 2020 मध्ये, दिल्लीत विनाअनुदानित सिलिंडर 593 रुपयांना उपलब्ध होते, जो आता 1103 रुपयांपर्यंत वाढला आहे.
उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.
- महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
- महिला बीपीएल कुटुंबातील असावी.
- महिलेकडे बीपीएल कार्ड आणि रेशन कार्ड असावे.
- एलपीजी कनेक्शन अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर नसावे.