उपमुख्यमंत्री अजित पवार आज उत्तर सभा घेत आहेत. म्हणजे राष्ट्रवादी 100 टक्के फूटली आहे, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.आज पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले, शरद पवारांच्या सभेला प्रतिसभा घेऊन उत्तर दिले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी 100 टक्के फूटली आहे, असेच म्हणावे लागेल. राष्ट्रवादीचे 9 आमदार फुटून सत्तेत सामील झाले आहेत.
मोदींबाबत आताच दृष्टांत का?
दरम्यान, काल बारामती येथे जाहीर सभेत आपण सत्तेसाठी नाही तर केवळ विकासासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे अजित पवार म्हणाले होते. यावेळी देशात मोदींसारखे दुसरे नेर्तृत्व आता तरी नाही. हे सत्य नाकारून चालणारच नाही. मोदींसारखा काम करणारा दुसरा नेता या देशात नाही, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, अजित पवार म्हणतात पंतप्रधान मोदींसारखा काम करणारा कोणी नाही. त्यांना आत्ताच हा दृष्टांत का झाला? 10-20 वर्षांपूर्वी तो का झाला नाही हा प्रश्न आहे.
ईडीमुळेच अजित पवार भाजपसोबत
विजय वडेट्टीवार म्हणाले, अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले आहेत. अजित पवार मी सत्तेसाठी गेलो नाही, हे सत्य सांगत आहेत. कारण ते ईडीच्या भीतीमुळे राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडले आहेत. सत्ता ही सर्वोच्च म्हणूनच पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय झाला असावा.
विजय वडेट्टीवार म्हणाले, मी यापूर्वीच मुख्यमंत्री झालो असतो असे वक्तव्य अनेकदा अजित पवार यांनी केले आहे. याचा अजितदादांच्या मनात मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी ते गेले असते तर समजू शकलो असतो. पण, अजित पवार काही मुख्यमंत्री झाले नाही. अजित पवार इकडून तिकडे आणि तिकडून इकडे गेले, पण, त्यांना उपमुख्यमंत्रीपदच मिळाले. त्यामुळे ते सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच भाजपसोबत गेले.
मनसेचे आंदोलन योग्यच
मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडले आहेत. तसेच, या रस्त्याचे कामही अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. याविरोधात मनसेकडून आज कोकणात जागर यात्रा काढण्यात आली आहे. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, मनसे करत असलेले आंदोलन योग्यच आहे. यापूर्वीच हे आंदोलन व्हायला पाहिजे होते. या रस्त्यावरुन लोकांना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. गणेश उत्सवात संपूर्ण चाकरमानी कोकणात जातात. समृद्धीपेक्षा हा रस्ता जास्त महत्त्वाचा होता. त्यामुळे राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्या आंदोलनाचा फायदा व्हावा आणि रस्त्याचे काम व्हावे, एवढीच अपेक्षा आहे.