• Tue. Aug 19th, 2025

शेतकऱ्यांसाठी एवढे दळभद्री विचाराचे केंद्र सरकार पाहिले नाही; कांदा प्रश्नांवर ओमराजे निंबाळकर भडकले

Byjantaadmin

Aug 23, 2023

शेतकऱ्यांनां चार पैसे मिळायला लागले की या सरकारची झोप मोडते आणि शेतकरी विरोधी काम सुरु करते. एवढ्या नीच आणि दळभद्री विचारांचे केंद्र सरकार आजपर्यंत पाहिले नाही, अशा शब्दात खासदार ओमराजे निंबाळकर निलंगा (जि. लातूर) यांनी थेट केंद्र सरकारलाच खडे बोल सुनावले आहेत.कांद्यावरील ४० टक्क्यांच्या निर्यात करावरून शेतकरी संघटनांही चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यासाठी काल राज्यभरात मोठी आंदोलनेही झाली. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने काल दोन लाख मेट्रीक टन कांदा प्रति क्विंटल दोन हजार ४१० रूपये दराने खरेदी करण्याच्या निर्णय जाहीर केला. पण त्यावरही शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. आजही शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यावर खासदारओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

Omraje Nimbalkar News

 

  खतांचे भाव वाढले की सरकार तातडीने ते पाडण्यासाठी पुढे येत नाही. सिमेंटचे दर भडकले तरी सरकार हालत नाही, घरे बांधकामासाठी लागणाऱ्या गजणी (सळई)च्या दरात वाढ झाली की ते पाडण्यासाठीकेंद्र सरकार पळत नाही, मात्र शेतकऱ्यांचे सोयाबीन, कांदा, टमाट्याचे भाव वाढले की केंद्र सरकार अत्यंत चपळाईने भाव पाडण्याचे काम करते. आताही कांदा चे दर थोडे वाढले की तातडीने निर्यात करात वाढ करून दर पाडण्याचे काम चालू आहे, केवळ शेतकऱ्यांना चार पैसे मिळायला लागले की या सरकारची झोप मोडते, आणि शेतकरी विरोधी काम सुरु करते, एवढ्या नीच आणि दळभद्री विचारांचे केंद्र सरकार आजपर्यंत पाहिले नाही, अशा कडक शब्दात खासदार ओमराजे निंबाळकर निलंगा (जि. लातूर) यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. ते आढावा बैठकीच्या वेळी कांदाप्रश्नावर बोलत होते.एकेकाळी सोयबाीनचे दर क्विंटलला दहा हजार रुपये झाले होते. मात्र सध्या याच सोयाबीनचा दर साडेचार हजार रुपये सुरु आहे. एक क्विंटलमागे शेतकऱ्यांचे पाच ते सहा हजार रुपये नुकसान होते आहे. यानुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांचे वर्षाला दीडलाख रुपये नुकसान करायचे आणि त्याच्या सन्मान म्हणून केवळ सहा हजार रुपये द्यायचे, ही सरळ सरळ दिशाभूल आहे.

तीन महिन्यांपूर्वी टमाट्यांचे दर वाढले की सरकारने तातडीने टमाटे आयात करण्याचा निर्णय घेतला. तर आता कांद्याचे दर वाढतच होते, की लागलीच ते पाडले. एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही काम करत असल्याचे केंद्र सरकार सांगते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे तातडीने भाव पाडते, मग उदरनिर्वाहाचे शेतीशिवाय दुसरे साधन नसणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आत्महत्याशिवाय काय पर्याय राहतो, हे सरकारनेच सांगावे. गेल्या नऊ वर्षात सरकार शेतकऱ्यांचा केवळ द्वेषच करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी नक्की जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *