पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ( ८ ऑगस्ट ) महाराष्ट्रातील ‘एनडीए’च्या खासदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही, असं विधान मोदींनी केलं. या विधानानंतर राज्यासह देशात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर भाष्य केलं आहे.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचं काम केलं,” असं मोदींनी म्हटलं.याबद्दल नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी nana patole यांना प्रश्न विचारला. त्यावर नाना पटोले म्हणाले, “एवढी काळजी आहे, तर मोदींनी शरद पवारांना पंतप्रधान बनवावे.”
भाजपाने नव्हे तर शिवसेनेनं युती तोडली, असेही मोदींनी म्हटलं. त्याबद्दल विचारल्यावर नाना पटोले यांनी सांगितलं, “मोदींनी मणिपूर, बेरोजगारी, शेतकरी, गरीबी, महागाईबद्दल बोललं पाहिजे. गेली नऊ वर्षे झाले देशातील जनता राजकीय भाषण ऐकत आहे. जनता ‘मन की बात’ ऐकण्यासही तयार नाहीत. मणिपूर पेटत असताना पंतप्रधान मौन ठेवत असतील, तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती नाही.”