• Thu. Jun 19th, 2025

डोळ्यांच्या साथीत मंत्री तानाजी सावंतांचा कारभार ‘डोळ्या’वर

Byjantaadmin

Aug 7, 2023

कोरोनामुळे जनता आधीच मेटाकुटीला आली होती. त्यातून बाहेर पडल्यानंतर आता राज्यात डोळ्यांची साथ वेगाने फैलावत आहे, साथीचे आजार रोखण्यासाठी शासनाची आरोग्य यंत्रणा सज्ज असायला हवी. पण राज्यकर्ते मात्र आपली खुर्ची सांभाळण्यात मश्गुल आहेत, अशी टीका करत बहुजन रयत परिषदच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. कोमल साळुंखे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावतांवर निशाणा साधला आहे. इतकेच नव्हे तर आरोग्य विभागाने उपाययोजना न केल्यास राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशाराही साळुंखे यांनी केला आहे.

कोरोनानंतर आरोग्य विभागाने अधिक सक्षमतेने आणि गांभीर्याने काम करायला हवे होते. राज्य सरकारने मात्र गांधारीप्रमाणे भूमिका घेतली आहे. सरकारला सत्तेशिवाय काहीच दिसत नाही. राज्य सरकार एकीकडे महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत यासारख्या मोठ्या योजना राबवत असूनही साथीचे आजार रोखण्यात मात्र आरोग्य यंत्रणा कूचकामी ठरल्याची टिकाही कोमल साळुंखेंनी केली आहे.

साळुंखे म्हणाल्या, “राज्यात एकूण 977 व्ही .जी. एन. टी. आश्रमशाळा, 10 एससी आश्रमशाळा, 630 एसटी आश्रमशाळा, तर, 200 केंद्रीय आश्रमशाळा आहेत. राज्यात एकूण 2 हजार 388 अनुदानित वसतिगृहे आहेत. याठिकाणी हजारो गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. सरकारकडून या शाळांना सोयी-सुविधा पुरवणे गरजेचे असतानाही त्या सोयीसुविधा वेळेवर उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. वीस टक्के अनुदानाचा प्रश्नही सुटला नसल्याने या शाळांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

डोळ्यांच्या संसर्गाने या शाळांमधील विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले असता त्याठिकाणीही पुरेशी औषधे उपलब्ध नाहीत. आरोग्य कर्मचारीही उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.तिथे कुणीही रुग्णाची कोणी दखल घेत नाही. काही आरोग्य केंद्रामंध्ये तर वरिष्ठ अधिकारीदेखील नाहीत. काही ठिकाणी डॉक्टर रजेवर आहेत तर कोणी राजीनामा दिला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात साथीच्या आजारावर औषध उपलब्ध असू नये, ही आरोग्य विभागासाठी मोठी लाजिरवाणी बाब असल्याचेही कोमल साळुंखेंनी म्हटलं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *