श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात कुमार महर्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर आजच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
कोर्टानेच मनाई आदेश द्यावा
महात्मा गांधी, महात्मा फुले अशा महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य करून संभाजी भिडे सामाजिक व जातीय एकोपा नष्ट करत आहेत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, वारंवार जाहीर कार्यक्रमांमध्ये वादग्रस्त करूनही त्यांच्या वक्तव्यावर कुणाचेही नियंत्रण नाही, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयानेच अशी वक्तव्य करण्यापासून त्यांना मनाई करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
जाणीवपूर्वक वक्तव्ये
याचिकेत म्हटले आहे की, महापुरूषांबाबत बदनामीकारक वक्तव्य करण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकदा जाणीवपूर्वक ही बदनामीकारक वक्तव्ये केली जात असल्याचे दिसत आहे. अशी वक्तव्य करून देशातील सामाजिक आणि जातीय एकोपा नष्ट करत लोकांमध्ये जातीय तेढ वाढण्याचा प्रयत्न केला जात आहे.अशी वक्तव्ये समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली जात असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची यादी करावी
प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांतून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या महापुरुषांबाबतच्या आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्यांबाबतचा प्रसार रोखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची प्रमुख मागणी या याचिकेतून केली गेली आहे. तसेच महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना प्रसारमाध्यमे किंवा समाजमाध्यमांतून अपमानास्पद टिप्पणी करण्यापासून मनाई करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याचे मागणीही याचिकाकर्त्यांनी याचिकेत केली आहे.
देशाच्या एकतेचे नुकसान
याचिकेत म्हटले आहे की, मुळात ज्या महापुरूषांबाबत अपमानस्पद वक्तव्य् केली जात आहेत ती आता हयात नाहीत. महापुरुषांचे कुटुंबीयही अशा वक्तव्यांकडे सहसा दुर्लक्ष करतात. मात्र, यामुळे राष्ट्र म्हणून देशाच्या एकात्मकतेचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. केंद्र अथवा राज्य सरकारकडून या मुद्द्यांवर सारवासारव करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत केंद्र व राज्य सरकारला ठोस अशा सूचना द्याव्यात.
काय म्हणाले होते भिडे?
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे खळबळजनक वक्तव्य मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केले होते. भिडे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा फुले व साईबाबांबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले आहे.