• Wed. Jun 18th, 2025

निलंगा कासार शिरसी रोडवर चक्का जाम

Byjantaadmin

Aug 4, 2023
 निलंगा कासार शिरसी रोडवर चक्का जाम… शेकडो नागरिकांनी जिल्हाधिका-याला दिले निवेदन
निलंगा/प्रतिनिधी   गेल्या ४० ते ५० वर्षापासून निलंगा हे आमचे बाजारपेठेचे  ठिकाण आहे. तसेच निलंगा हे आम्हा ग्रामपंचायत साठी महसूल तालुका ठिकाण आहे.आम्हा गावकरी बांधवांना शिक्षणासाठी, बँकेसाठी, भूमी अभिलेखासाठी, पंचायत समिती मधील कामासाठी, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागासाठी, उप जिल्हा रुग्णालयासाठी, एम एस ई बी महावितरण कार्यालयासाठी, कृषी विभागासाठी, पोलीस उपविभागीय कार्यालयासाठी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इत्यादी कार्यालयीन कामासाठी आम्हाला निलंगा येथे जावे लागते. म्हणत निलंगा तालुक्यातील भुतमुगळी येथे ६३ गावातील हजारो नागरिकांनी रास्तारोको केल्याने निलंगा कासार शिरसी रस्ता चक्का जाम झाला होता.
 निलंगा जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे पक्की रस्ते आहेत परंतू आता महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय मंजूर करून अप्पर तहसील कार्यालय कासार शिरशी येथे स्थापन करून निलंगा तालुक्यातील   महसुली गावे कासार शिरसी येथे स्थापन होणाऱ्या कार्यालयास जोडण्याचा निर्णय घेतला आहे.सदरील शासन निर्णय पारित करीत असताना सदरील  गावातील नागरिकांची व ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकार ची संमती किंवा तेथील ग्रामपंचायती सोबत विचार विमर्श केला गेला नाही.असा आरोप आमदारावर केला आहे.
 तसेच ६३ गावांपैकी ८० टक्के गावे हे निलंगा शहराच्या आजूबाजूला वसलेली आहेत व निलंगा येथे जाण्यासाठी पक्के रस्ते उपलब्ध आहेत परंतु कासार शिरशी हे गाव कर्नाटक राज्याच्या सीमेवरील गाव असून ६३ गावांपैकी ८० टक्के गावांना कासार शिरशी येथे जाण्यासाठी पक्के रस्ते व महाराष्ट्र शासनाच्या एसटी उपलब्ध नाहीत.महाराष्ट्र शासनाचे अनेक सरकारी कार्यालय निलंगा येथे उपलब्ध आहेत त्यामुळे आम्हा नागरिकांना दैनंदिन कामासाठी निलंगा येथे जावेच लागते सदरील शासन निर्णयामुळे फक्त महसुली कामे करण्यासाठी कासार शिरशी येथे जावे लागणार आहे. फक्त एका कामासाठी कासार शिरसी  येथे जाणे येणे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही.तसे केले तर आम्हाला आमच्या गावापासून निलंगा येथे यावे लागेल व तेथून कासार शिरशी येथे जावे लागेल त्यामुळे आम्हा नागरिकांना शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे.
 सदरील १८ जुलै २०२३ रोजी चा शासन निर्णय रद्द करून आम्हा नागरिकांना न्याय द्यावा असे निवेदन जिल्हाधिकारी याना दिले आहे.
या निवेदनावर तालुका एकसंघ कृती समितीचे अध्यक्ष संभाजी तारे, कार्यध्यक्ष प्रा. अशोक सूर्यवंशी, उपाध्यक्ष, रामकिशन सावंत, उपाध्यक्ष अनिल  अरीकर, सचिव , दयानंद मुळे, प्रसिद्धी प्रमुख प्रमोद पाटील व या विरोधातील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हजारो नागरिक यानी या रास्तारोको मध्ये सहभागी झाले होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *