नवीन शैक्षणिक धोरणात सर्वच ज्ञान शाखा श्रेष्ठ आहेत -प्र-कलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बीसेन
निलंगा (प्रतिनिधी):- नवीन शैक्षणिक धोरण हे पूर्णतः विद्यार्थी केंद्रित शिक्षण देणारे आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या विद्याशाखांचा अभ्यास करण्याची संधी, विषय निवडीचे स्वातंत्र्य, समान श्रेयांक पद्धतीचा अवलंब, विविध उपक्रमांचा अभ्यासक्रमात समावेश यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानप्राप्तीसाठी नवीन शैक्षणिक धोरणात भरपूर संधी उपलब्ध झालेल्या आहेत. शाखा कोणतीही असो नवीन शैक्षणिक धोरणात सर्वच शाखा श्रेष्ठ आहेत. प्रत्येक ज्ञानशाखा ही एकमेकांशी जोडली गेली आहे.
असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र.कुलगुरू
डॉ. जोगेंद्रसिंहजी बिसेन यांनी व्यक्त केले. निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावी अंमलबजावणी सप्ताह निमित्त आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की आपल्या देशात नालंदा, तक्षशिला यासारखी जगाला ज्ञान देणारी विद्यापीठे होती. परंतु आज मात्र बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला बदलण्याची गरज निर्माण झालेली आहे त्यासाठी हे नवीन शैक्षणिक धोरण आवश्यक आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० ची महाविद्यालयांमध्ये प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नवीन शैक्षणिक धोरण राबवत असताना तज्ञ प्राध्यापकांची समिती स्थापन करून अभ्यासक्रम तयार केलेला आहे, त्यामुळे सर्वच विद्यापीठांमध्ये तो यशस्वीपणे राबविला जाईल. राज्य पातळीवर २४ ते २९ जुलै २०२३ या कालावधीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या संदर्भात कार्यशाळांचे आयोजन होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून निलंगा तालुक्यातील विविध महाविद्यालयांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या कार्यशाळेसाठी निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा, महाराष्ट्र औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय निलंगा, महाराष्ट्र पॉली.डी.फार्मसी इन्स्टिट्यूट निलंगा, मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालय औराद, रामदास आठवले महाविद्यालय निलंगा, सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय निटूर, देशमुख वरिष्ठ महाविद्यालय कासार शिरशी, शामगिर महाविद्यालय दापका. अशा विविध महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी इतर विद्यापीठापेक्षा आपल्या विद्यापीठाने श्रेयांक पद्धती लवकर स्वीकारली याबद्दल समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही उलट परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्याला याचा फायदा होईल असे मत व्यक्त केले.
या एकदिवसीय कार्यशाळे संदर्भात प्रतिक्रिया देताना डॉ. विजय पवार व प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यशाळेच्या विचार मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके , मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील, महाराष्ट्र औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर पाटील, रामदास आठवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद कांबळे, महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.प्रशांत गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजित मुळजकर, सूत्रसंचालन डॉ.हंसराज भोसले, डॉ. गोविंद शिवशेट्टे यांनी केले तर आभार डॉ.सुभाष बेंजलवार यांनी मानले.