• Wed. Jun 18th, 2025

काम करणाऱ्याला कधीतरी संधी मिळतेच, अजितदादांना आज ना उद्या मिळेल; मुख्यमंत्रीपदाबाबत प्रफुल पटेलांचं भाकित

Byjantaadmin

Jul 27, 2023

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाच्या मर्जीतील आणि पक्षाच्या थिंक टँकमधील महत्त्वाचा नेता म्हणून ओळख असणाऱ्या प्रफुल पटेल यांनी राज्यातील मुख्यमंत्री बदलाबाबत सूचक वक्तव्य केले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते लवकरच एकनाथ शिंदे यांची जागा घेतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेला अजित पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने खतपाणी घातले जात आहे. अजित पवार हे १० ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री होतील, असा दावा राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी केला होता. परिणामी शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री देतील, असे स्पष्टीकरण देत या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तर दुसरीकडे अजितदादा यांनीही आपल्या गटातील नेत्यांची कानउघडणी केल्याची चर्चा होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून मुख्यमंत्री बदलाबाबत पुन्हा वक्तव्यं केली जाणार नाहीत, अशी अपेक्षा होती.मात्र, आता प्रफुल पटेल यांच्या एका सूचक वक्तव्यामुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली आहे. प्रफुल पटेल हे मुरब्बी, मुत्सद्दी आणि तोलूनमापून बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना गुरुवारी प्रसारमाध्यमांकडून अजित पवार मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रफुल पटेल यांनी म्हटले की, असं आहे की, आज ती जागा (मुख्यमंत्रीपद) रिकामी नाही, मग चर्चा कशासाठी करायची? अजित पवार हे नक्कीच महाराष्ट्रातील वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्त्व करत आहेत. काम करणाऱ्याला कधी ना कधी, आज ना उद्या संधी ही मिळतच असते. आतापर्यंत काम करणाऱ्या अनेकांना तशी संधी मिळाली आहे. त्यामुळे अजितदादा पुढच्या काळात कधीतरी मुख्यमंत्रीपदाची संधी जरुर मिळेल,असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

यापूर्वी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या १० तारखेपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होतील, असे भाकित वर्तविले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा लागेल. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवले जाईल. त्यानंतर मुख्यमंत्रीपद रिक्त होईल, त्याठिकाणी अजित पवार विराजमान होतील, अशी थिअरी पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली होती. तर काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अभिजीत वंजारी यांनीही एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत सहकुटुंब पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट ही त्यांच्या सेंड ऑफची तयारी असल्याची शक्यता बोलून दाखवली होती. त्यामुळे १० ऑगस्टला महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *