• Thu. Jun 19th, 2025

गर्भवतीला पुराच्या पाण्यातून लाकडी फळीवरून नेले रुग्णालयात; धक्कादायक VIDEO समोर

Byjantaadmin

Jul 25, 2023

गावात कोणी आजारी पडल्यास लाकूड आणि चादरीच्या साह्याने डोली करून येथील रुग्णांना लाकडी फळीच्या आधारावर नदी पार करावी लागते.

यापूर्वी धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरागांत वसलेलेल्या गावात रस्ता नसल्याने गरोदर महिलेल्या डोलीतून ६ किलोमीटरपर्यंत पायपीट केल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला होता. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना रस्ते नसल्याचेही समोर आले होते. आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नदीवर पूर नसल्याने लोक नदी पार करण्यासाठी जीवघेणी कसरत करत असल्याचे समोर आले आहे. एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी लाकडी फळीच्या सहाय्याने नदी पार करत असतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

पालघरमधील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या दुर्गम ग्रामीण गावपाड्यांना जोडणारे रस्ते आणि नद्यांवर पूल नसल्याने नागरिकांना पुराच्या पाण्यातूनधोकादायक प्रवास करावा लागतआहे. मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास चार ते पाच पाड्यांना जोडणारा पिंजाळ नदीवर पूल नसल्याने येथील नागरिकांना नदीतील वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याच धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा उघड झाल आहे.

गावात कोणी आजारी पडल्यास लाकूड आणि चादरीच्या साह्याने डोली करून येथील रुग्णांना लाकडी फळीच्या आधारावर नदी पार करावी लागते. सोमवारी एका गरोदर मातेला अचानक उलट्या होऊ लागल्याने तिला आधी डोलीतून नंतर लाकडी फळीवर नदी पार करावी लागली या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओ नंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीत शेंड्याचा पाडा, आंबे पाडा, रायपाडा आणि जांभूळपाडा या जवळपास ५०० हून अधिक लोकसंख्या असलेल्या पाड्यांमधील नागरिकांना पावसाळ्यात नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. दरवर्षी त्यांना या संकटाचा सामना करावा लागतो. ग्रामस्थांना गावाच्या बाहेर जाण्यासाठी पिंजाळ नदी पार करावी लागते मात्र या नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते.पिंजाळ नदी पावसाळ्यात चारही महिने दुधडी भरून वाहते, या काळात गावात शिक्षकही पोहोचू शकत नसल्याने शाळाही बंद राहतात व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पूलाची मागणी होत असून याकडे प्रशासन आणि सरकारने दुर्लक्ष केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर पिंजाळ नदीवर पूल उभाण्याची मागणी शेंड्याचा पाडा, आंबे पाडा, रायपाडा आणि जांभूळपाडा या गावातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *