• Fri. Jun 20th, 2025

आमदार बागडे यांनी लातूरकरांनी माफी मागावी ;लातूरची बदनामी खपवून घेणार नाही.- माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा इशारा

Byjantaadmin

Jul 23, 2023
आमदार बागडे यांनी लातूरकरांनी माफी मागावी.
लातूरची बदनामी खपवून घेणार नाही.- माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा इशारा
जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करण्यापेक्षा मराठवाड्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्न करावा.
    लातूर/प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या विधानसभेत रझाकारांचा प्रमुख कासिम रिझवी हा लातुरचा असल्याचे विधान करत भाजपा आमदार हरिभाऊ बागडे यांनी लातुरची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य त्यांनी विधानसभेत केले. वास्तविकता कासिम रिझवी हा लातुरचा नव्हता तर केवळ कांही दिवस त्याच्या उदरनिर्वाहासाठी लातूर येथे राहिला होता. आमदार बागडे यांनी इतिहास तपासून बोलावे आणि लातुरकरांची माफी मागावी अन्यथा मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिला आहे.
    मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामास यावर्षी ७५ वर्ष पूर्ण झाले असून विधानसभेच्या अधिवेशनात मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या चर्चे दरम्यान फुलंब्रीचे भाजपा आमदार हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेत बोलताना रझाकार संघटनेची स्थापना करणारा कासिम रिझवी हा लातुरचा होता, असा उल्लेख केला. आणि याला जोड देत जातीय भावना भडकविनारे वक्तव्य केले. परंतु वास्तविकता कासिम रिझवी हा लातुरचा नव्हता, तर त्याचे सासरे निजाम सैन्यात होते. ते लातुरात कर्तव्यावर होते. त्यामुळे काही काळ रिझवी हा लातूर येथे वकिली करून त्याचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी राहिला होता. त्यानंतर हैद्राबाद येथे स्थायिक झाल्यावर त्याने रझाकार संघटनेचे प्रमुख पद मिळविले. मुळात रझाकार संघटनेची स्थापना देखील त्याने केलेली नव्हती परंतु कालांतराने त्या संघटनेचा तो प्रमुख झाला होता हा इतिहास आहे. कासिम रिझवीचा जन्म उत्तर प्रांतातील असून त्याने त्याकाळी अलिगढ विद्यापीठात शिक्षण घेतले होते. रिझवी केवळ त्याच्या उदरनिर्वाहासाठी काही काळ लातूर येथे होता त्यामुळे रिझवी लातूरचा होता असे धाधांत खोटे विधान करीत आणि लातूरचा रझाकार संघटनेशी  संबंध जोडून तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून लातूरची बदनामी आमदार बागडे यांनी करू नये अन्यथा त्यांच्या विरोधात लातूरकरांच्या वतीने मानहानीचा खटला दाखल करू असा इशारा लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
   मराठवाडा मुक्त होण्यापूर्वी ३ वर्ष म्हणजे १९४४ साली जन्म झालेल्या आणि ३० वर्षांपासून आमदार असणाऱ्या हरिभाऊ बागडे यांना कदाचित हा इतिहास तपासण्याची तसदी घेतली नसावी. मुळात मराठवाडा मुक्तिसंग्राम हा कोण्या एका जाती – धर्मा विरोधात नव्हे तर निजामाच्या जुलमी शासन विरोधातील लढा होता. या लढ्यात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होते. लातूरकरांनी या लढ्यात अग्रणी सहभाग घेतला होता, किंबहुना निजाम आणि रझाकार संघटनेच्या अत्याचाराच्या सर्वाधिक झळा लातूरकरांनी सोसल्या आहेत. रझाकारांनी लातूरच्या जनतेवर अनन्वित अत्याचार केले,
छळ केला. आमच्याही पूर्वजांनी त्याच्या झळा सोसल्या आहेत. परंतू आम्ही कुठल्या जातीला दोष देवून त्याचे भांडवल केले नाही असेही गोजमगुंडे म्हणाले.
    आज लातुरमध्ये सर्व जातीधर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. आजवर लातूर मध्ये एकही जातीय दंगल घडली नाही. सर्व लातूरकरांनी आजवर सामाजिक सलोखा टिकवून ठेवला आहे. अशा स्थितीत राजकीय लाभासाठी विधानसभेत असे विधान हरिभाऊ बागडे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने करणे योग्य नाही. यासाठी त्यांनी लातूरकरांनी माफी मागवी अशी मागणी लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केली. तसेच यापुढे तरी त्यांनी इतिहासचे आकलन करून घ्यावे. त्यानंतरच अशी विधाने करावीत. विनाकारण लातुरची बदनामी करू नये.
लातुरकर जनता अशी बदनामी सहन करणार नाही असा इशाराही विक्रांत गोजमगुंडे यांनी दिला आहे.
आमदार बागडे यांना पुस्तक भेट देणार. – माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे
फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी रझाकार संघटनेचा कासिम रिझवी लातूरचा होता असे वक्तव्य विधानसभेच्या अधिवेशनातील चर्चे दरम्यान केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाचा इतिहास उलगडणारे मराठवाड्याच्या मुक्ती गाथा हे पुस्तक लातूरकरांच्या वतीने आमदार बागडे यांना भेट देणार असल्याचे लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले. विशेषतः हे पुस्तक प्रशासकीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, रुपाली आवले आणि इतिहास संशोधक भाऊसाहेब उमाटे यांनी संकलित केले आहे. सदर पुस्तक मराठवाड्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधींनी वाचले पाहिजे असेही ते म्हणाले.
कामकाजातून उल्लेख वगळावा यासाठी विधानसभा अध्यक्षांना निवेदन
आमदार हरिभाऊ बागडे यांनी रझाकार संघटनेचा कासिम रिझवी लातूरचा होता असा चुकीचा उल्लेख केला तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले यापार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशन कामकाजातून सदर आक्षेपार्ह उल्लेख वगळण्यात यावा याकरिता विधानसभा अध्यक्ष यांना लातूरकरांच्या वतीने निवेदन पाठविण्यात येणार असल्याची माहिती लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *