युवकांनी नोकरी शिवाय उद्योग, व्यवसायाकडे वळावे -डॉ. चेतन सारडा
-मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा गुणवंत विद्यार्थी गौरव आणि शिष्यवर्ती वितरण समारंभ उत्साहात संपन्न
लातूर
जागतिकीकरणाच्या काळात अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी करिअर करताना नोकरी एवढाच विचार न करता उद्योग, व्यवसायाचा विचार करून त्या दृष्टीने पुढील उच्च शिक्षण घेतल्यास उत्तम उद्योजक बनू शकता असे प्रतिपादन अभिनव मानव विकास संस्था संचलित श्री किशन सोमाणी विद्यालयाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध डॉ. चेतन सरडा यांनी केले.
श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा गुणवंत विद्यार्थी गौरव आणि शिष्यवृत्ती वितरण समारंभाचे आयोजन शनिवारी सायंकाळी दयानंद सभागृहामध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. चेतन सारडा प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, संस्था अध्यक्ष शैलेश लाहोटी, सचिव ॲड. आशिष बाजपाई, उपाध्यक्ष राजेंद्र मालपाणी, सहसचिव शरदकुमार नावंदर, उपसहसचिव लक्ष्मीकांत कर्वा, संस्थेचे सदस्य कमलकिशोर अग्रवाल, बालकिशन बांगड, चैतन्य भार्गव, किशोर भराडीया, आशिष अग्रवाल, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे चेअरमन आनंद लाहोटी व संस्था अंतर्गत सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
गुणवंत विद्यार्थी समारंभात मार्गदर्शन करताना डॉ. सारडा म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनातील दहावी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. मेडिकल, इंजिनियरींग , महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यांना प्रतिष्ठेचे करिअर समजले जाते. देशभरातून सुमारे दहा ते बारा लाख विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रयत्न करतात परंतु निवड फक्त अकराशे ते बाराशे जणांची होते. स्पर्धेच्या युगात अनेक संधी उपलब्ध आहेत आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवून काम केल्यास आपण यशस्वी व आनंदी होतो म्हणून विद्यार्थ्यांनी नोकरीचा विचार न करता उद्योग व्यवसायाचा विचार करावा.
कोणत्याही शाखेचा अभ्यास करताना देश, जागतिक पातळीवरील काय घडामोडी, संशोधन चालू आहेत यांचादेखील अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा आणि चांगले संबंध उत्तम कौशल्य आत्मसात करावे. शिवाय स्वतःला परिपूर्ण बनवण्यासाठी सर्व विषयांच्या अभ्यासाची गरज असते, ही गरज ग्रंथ वाचनातून भागू शकते. अभ्यासाव्यतिरिक्त इतर वाचन केल्यास खूप फायद्याचे होईल. जीवनात वाचनाचे महत्त्व अनेक जागतिक विचारवंतांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्ञानार्जनासाठी करावा. केवळ तंत्रज्ञानाच्या बळावर परिपूर्ण समाज निर्माण होऊ शकत नाही. मोबाईल हे दुधारी शस्त्र असून त्याचा अतिरेक होऊ नये याची काळजी पालकांनी स्वतः घ्यावी आणि आपल्या पाल्यांना मोबाईलचा व्यसनापासून दूर ठेवावे, असे आवाहन डॉ सारडा यांनी केले.
संस्था अध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था ही गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणारे केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी अधिक ज्ञान घेऊन सामर्थ्यशाली बनावे आणि जगात कोठेही गेल्यास आपले कर्तुत्व मातृभूमीच्या चरणी अर्पण करावे आणि संस्थेला स्मरणात ठेवावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव ॲड आशिष बाजपाई यांनी केले. ते म्हणाले की राजस्थान शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम करीत आहे. पुरणमलजी लाहोटी यांनी लावलेले हे रोपटे त्याचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात झाले आहे. हा वटवृक्ष जोपासण्याचे कर्तव्य सर्व संस्थेचे पदाधिकारी करत आहेत. संस्था संगणकीय व शारीरिक शिक्षणाला देखील महत्त्व देत आहे. बॅडमिंटन मध्ये करिअर घडविण्यासाठी पुण्यातील पालकाने आपल्या मुलीला राजस्थान संस्थेअंतर्गत इंग्लिश स्कूल लातूर मध्ये प्रवेश घेतला यातूनच शारीरिक शिक्षणाचे महतव आणि लातूर पॅटर्नची ओळख दिसून येते. संस्थेद्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि शिष्यवृत्ती वितरण समारंभात संस्था अंतर्गत विविध शाळांतील जवळपास 74 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कुलकर्णी व योगिता संदिकर यांनी तर आभारप्रदर्शन लक्ष्मीकांत कर्वा यांनी केले.