• Fri. Jun 20th, 2025

400 किलो टोमॅटोची चोरी, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Byjantaadmin

Jul 22, 2023
अनेकदा मागणीच्या तुलनेत जास्त पुरवठा झाल्याचे कारण देत व्यापारी शेतमालाला कमी भाव देतात यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतीसाठी जेवढा खर्च झाला तो पण भरून निघत नाही. पण सध्या उलट परिस्थिती आहे. टोमॅटोच्या पिकाला मोठा दर मिळत आहे. यामुळे टोमॅटोची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकाच्या गुणवत्तेनुसार चांगला भाव मिळत आहे. बाजारात टोमॅटो चढ्या दराने विकला जात आहे. टोमॅटो महाग झाल्याचे सांगण्यासाठी इंटरनेटविश्वात अनेक जोक आणि मिम्स व्हायरल होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने टोमॅटोच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केल्याची बातमी पण काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. आता महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून टोमॅटो संदर्भात एक बातमी आली आहे. पुणे जिल्ह्यातून 400 किलो टोमॅटोची चोरी झाली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अरुण ढोमे नावाच्या शेतकऱ्याने टोमॅटोची चोरी झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली आहे. बाजारात नेऊन विकायचे म्हणून 400 किलो टोमॅटो व्यवस्थित पॅक करून ठेवले होते. टोमॅटोच्या पेट्या सकाळी एका वाहनात ठेवून ते वाहन बाजारात नेण्याचे नियोजन होते. पण सकाळी शेतकरी अरुण ढोमे यांना पॅक केलेल्या पेट्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. तब्बल 400 किलो टोमॅटोची चोरी झाली. या चोरीमुळे 20 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, असे शेतकरी अरुण ढोमे यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. टोमॅटोच्या चोरी प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.अलिकडेच पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने टोमॅटोच्या 18 हजार पेट्या बाजारात विकून 3 कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशात अनेक ठिकाणी चांगले टोमॅटो हे 200 ते 300 रुपये किलो या दराने विकले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी यंदा टोमॅटोची राखण करणे हेच मोठे आव्हान झाले आहे.
एरवी ज्या पिकाला चांगला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना रक्ताचे पाणी करावे लागते त्याच टोमॅटोच्या रक्षणासाठी राखणदारांची फौज उभी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर शेती करणाऱ्यांना पिकाच्या रक्षणासाठी आधुनिक संरक्षण यंत्रणा उभी करणे शक्य आहे. पण छोट्या प्रमाणात टोमॅटोची शेती करणाऱ्यांसाठी पिकाचे संरक्षण करणे ही कठीण बाब झाली आहे. शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य आळीपाळीने राखण करून पिकाचे रक्षण करत आहेत. जिथे ही व्यवस्था करणे कठीण आहे अशा ठिकाणी टोमॅटोची चोरी होण्याचा धोका वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *