मणिपूर घटनेवर सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर राज्यातील भाजपाच्या एका आमदाराने टीका करत कोर्टालाच सुनावणारे ट्वीट केले आहे. सुप्रीम कोर्ट व सरन्यायाधीशांवर बोलण्याची या भाजपा आमदाराची हिम्मत ही सत्तेचा माज असल्याने झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या प्रकरणी राज्यपाल व मा. सरन्यायाधीश यांना अवगत करु असे नाना पटोले म्हणाले.
मणिपूर तीन महिन्यापासून जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, फ्रान्सच्या दौऱ्यात व्यस्त होते तेथून देशात आले तर पक्षाचा प्रचार करण्यात मग्न राहिले. मणिपूरवर एक शब्दही त्यांनी काढला नाही. 78 दिवसानंतर पंतप्रधान मोदींनी मौन सोडत, कोणालाही सोडणार नाही’ असे विधान केले. एवढे बोलण्यास त्यांना तीन महिने लागले. सुप्रीम कोर्टाने मणिपूर प्रकरणाची दखल घेत सरकारने कारवाई करावी अन्यथा कोर्ट कारवाई करेल असे म्हटले होते, त्यांची चिंता स्वाभाविकच आहे.
भाजपाच्या राज्यात महिलेची विवस्त्र धिंड
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या राज्यात महिलेची विवस्त्र धिंड काढून बलात्कार केला ही हैवानियत आहे. या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. देशाला कलंक लावण्याचे काम केले आहे. भारताच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे हे कृत निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष या घटनेचा निषेध करत आहे.
काँग्रेससह विरोधी सदस्यांचा सभात्याग
मणिपूरमध्ये महिला अत्याचाराच्या अत्यंत घृणास्पद घटना उघड झाल्या असून या घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने या घटनांकडे बघ्याची भूमिका घेतली असून अशा निष्क्रिय केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाचा ठराव सभागृहात मांडला जावा आणि मणिपूर घटनेवर चर्चा घडून आणली जावी अशी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे चर्चा मागितली होती. विधानसभा अध्यक्षांनी चर्चा नाकारल्याने काँग्रेससह विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.