लातूर, 21 जुलै : मैत्रीचं नातं म्हणजे त्याला कुठली बंधनं नसतात ना कुठले नियम, त्यामुळे मित्र हा नेहमी वणव्यामध्ये गारव्या सारखाच असतो. लातूरमध्ये एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला. आपल्या दोन मित्रांच्या अपघातात मृत्यू झाला, याची बातमी कळताच तिसऱ्या मित्राच्या ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना लातूरमध्ये घडली.मिळालेल्या माहितीनुसार, औसा तालुक्यातील उजनी येथील विश्व हॉटेलमध्ये हे तिन्ही मित्र कामाला होते.या हॉटेलमध्ये कामाला असलेल्या उजनी जवळच्या टाका येथून चंद्रकांत नगराळे (वय-28) आणि सुर्यदिप शिंदे -(वय-24) हे मोटारसायकल वरून हॉटेलकडे निघाले होते. मात्र वाटेतच अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.