• Sat. Jun 21st, 2025

“मणिपूर घटनेप्रकरणी भाजपाच्या मनात गुन्हेगारी भावना, म्हणूनच त्यांनी…”, बाळासाहेब थोरातांचा टोला

Byjantaadmin

Jul 21, 2023

मणिपूरमधील दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज (२१ जुलै) या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षांमधील महिला आमदारांनी मणिपूर प्रकरणावर बोलण्याची परवानगी मागितली. परंतु विधानसभा अध्यक्षांनी ती मागणी फेटाळून लावली. त्यामुळे काँग्रेसच्या महिला आमदार संतापल्या. या आमदारांनी अधिवेशनातून सभात्याग करत निषेध नोंदवला. तसेच त्यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षातील इतर आमदारांनीही सभात्याग केला.

Balasaheb Thorat (1)

मणिपूरमधील घटनेवर बोलू न दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) आमदार सभागृहाबाहेर पडले. यावेळी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, मणिपूरमध्ये घडलेली घटना ही केवळ मणिपूरची आहे असं म्हणता येणार नाही. अडीच महिने याप्रकरणी गुन्हादेखील नोंदवण्यात आला नव्हता. कोणतीही कारवाई केली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हालचाल सुरू झाली. हा सगळा प्रकार निषेधार्ह आहे. काही लोक ही घटना लोकांपासून लपवून ठेवू पाहत होते.बाळासाहेब थोरात म्हणाले, काल (२० जुलै) या घटनेवर पंतप्रधान MODI बोलले. परंतु ते संसदेबाहेर येऊन बोलले. ते संसदेत याविषयी काहीच बोलले नाहीत. मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर ही घटना खूप गंभीर आहे. या घटनेमुळे जगभर आपल्या देशाची छी-तू होत आहे. आज या विषयावर आमच्या महिला आमदारांना सभागृहात बोलण्याची संधी दिली नाही. पाच मिनिटंसुद्धा त्यांनी दिली नाहीत. कारण भारतीय जनता पक्षाच्या मनात या घटनेप्रकरणी आपण गुन्हेगार असल्याची भावना आहे. त्याचाच हा सगळा परिणाम आहे. म्हणून महिला आमदारांना विधानसभेत त्यांनी बोलू दिलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *