महाराष्ट्राची सकाळ उजाडली ती मन हेलावून टाकणाऱ्या बातमीने. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरड कोसळून आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली तर ५० हून अधिक जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं. तर अनेकजण बेपत्ता आहेत. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यही सुरु करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी इर्शाळवाडीचा दौरा केला. ही घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सध्या मदतकार्य महत्त्वाची बाब
रायगड जिल्ह्यातील इरसालवाडीतील दुर्घटनास्थळी युवासेना अध्यक्ष, शिवसेना नेते ,आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोचून. इथल्या दुर्घटनेबद्दल आदित्य ठाकरें यांनी आताच्या घडीला मदत कार्य महत्त्वाचं कसं घडलं का घडलं याबद्दल विधिमंडळात बोलूच अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे मांडलीय..
आदित्य ठाकरेंकडून पीडितांच्या कुटुंबीयांचं सांत्वन
यावेळी आदित्य ठाकरेंनी दरड कोसळलेल्या दुर्घटनास्थळी जाऊन दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना धीर दिला.स्थानिकांचा आक्रोश हा हृदयद्रावक आहे. ही घटना एवढी भीषण आहे की, भौगोलिक परिस्थितीमुळे, पावसामुळे अजूनही बचाव कार्यात अडथळा येत आहे. अशावेळी सरकारी यंत्रणा, स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहेतच. त्यांना यश येऊन इथले गावकरी सुखरूप ह्या संकटातून बाहेर येवोत, ही ईश्वर चरणी प्रार्थना असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
वाढदिवस साजरा करणार नाही-अजित पवार
“रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री ajit pawar यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करू नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गाव पुन्हा उभं करण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा”, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री म्हणाले की, “इथे वाहन येऊ शकत नाहीय. सर्व मॅन्युअली करावं लागतंय. एसडीआरएफ, एनडीआरएफ, सामाजिक संस्थांकडून मदत केली जातेय. त्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. जवळपास १०३ लोकांना ओळखण्यात यश आलंय. त्यात १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. बचाव कार्य आणि मदत कार्य सुरू आहे. काही लोक कामानिमित्त बाहेर गेले आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय. झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे. खरं म्हणजे अनेक नातेवाईकांना भेटलो, सरकार त्यांच्या पाठीशी आहे उभं. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुबीयांना शासन ५ लाखांची मदत करणार आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.