• Sat. Jun 21st, 2025

माणुसकीला काळिमा! दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावरून फिरवलं, भयंकर संतापला अक्षय कुमार

Byjantaadmin

Jul 20, 2023

मुंबई- सध्या सोशल मीडियावर मणिपूरचा तो लाजिरवाणा व्हिडिओ प्रत्येकाच्या अंगावर काटा आणत आहे. यात दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर फिरवले जात आहे. वास्तविक, मणिपूरमध्ये दोन गटांमध्ये सुरू झालेली भांडणे आता अत्यंत घाणेरड्या वळणावर पोहोचली असून या दोन महिलांचा व्हिडिओ आता माणुसकीला काळीमा फासणारा आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्वीट करून देशातील या निर्लज्ज घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.मणिपूरमधील या घटनेनंतर अक्षय कुमारने आज २० जुलै रोजी सकाळी एक ट्वीट केले. अक्षयने या पोस्टमध्ये दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, जेणेकरून पुन्हा असे कृत्य करण्याचा विचारही कोणी करणार नाही अशी आशा व्यक्त केली. महिलांची नग्न धिंड काढण्यात आलेल्या या घटनेचा संदर्भ देत त्याने लिहिले की, ‘मणिपूरमध्ये महिलांवरील हिंसाचाराचा व्हिडिओ पाहून मी हादरलो आहे, द्वेष वाढत आहे. मला आशा आहे की या प्रकरणातील दोषींना इतकी कठोर शिक्षा होईल की पुन्हा असे घृणास्पद कृत्य करण्याचा कोणी विचारही करणार नाही.’

व्हिडिओमध्ये पुरुष नग्न महिलांसोबत निर्लज्जपणाची हद्द ओलांडताना दिसत आहेत

मणिपूरचा हा भयावह व्हिडिओ म्हणजे तिथल्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणानंतरची एक लाजिरवाणी घटना आहे, ज्यामुळे आज संपूर्ण देश खजिल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक दोन महिलांना निवस्त्र करून रस्त्यावरून फिरवताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये त्या महिला सतत मदतीची याचना करताना दिसत आहेत आणि आजूबाजूला उपस्थित असलेले सर्व पुरुष निर्लज्जपणाची हद्द ओलांडताना दिसत आहेत.

जमाव नग्न महिलांना शेताकडे ओढताना दिसत आहे

या घटनेनंतर मणिपूरमधील एका आदिवासी गटाने दोन्ही महिलांना शेतात नेऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचे बोलले जात आहे. या क्रूर घटनेनंतर सोशल मीडियावर वादळ उठले आहे. या अमानुष घटनेवर लोक सतत संताप व्यक्त करताना दिसत आहेत. ही घटना ४ मे ची आहे, जी कांगकोपी जिल्ह्यातील आहे, ज्यामध्ये जमाव या नग्न महिलांना शेताकडे ओढून नेताना दिसत आहे. या घटनेत तीन महिलांना जमावाने मारहाण केल्याचे सांगितले जात आहे, त्यापैकी दोन महिलांचा व्हिडिओ समोर आला आहे.

या लाजिरवाण्या घटनेची सुरुवात कुठून झाली?

३ मे रोजी कुकी समाजाच्या लोकांनी ‘आदिवासी एकता मार्च’ काढला तेव्हाच या घटनांना सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या काळात कुकी आणि मेईतेई या आदिवासी समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला आणि त्या दिवसापासून मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे सांगितले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसक चकमकीत आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बलात्कार झालेल्या महिला कुकी समाजातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *