मुसळधार पावसामुळे भाईंदरमध्ये इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अनेक दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीचा तळमजला आणि पहिल्या मजल्याचा पुढील भाग कोसळला आहे. घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ धाव घेत काही लोकांना बाहेर काढले आहे. अग्नीशमन दल, पोलीस पथक घटनास्थळी दाखरल असून, युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु आहे.
इमारतीचा पुढचा भाग कोसळला
गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जीर्ण इमारतींना सर्वाधिक धोका असतो. असे असतानाही धोकादायक इमारतीत नागरिक वास्तव्य करतात. यामुळे अशा दुर्घटना घडतात. अशीच घटना भाईंदर पूर्वेला घडली आहे. स्टेशन समोर असलेल्या जुन्या इमारतीचा समोरील भाग सकाळच्या सुमारास कोसळला. या इमारतीत अनेक दुकाने आहेत. इमारतीखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.घटना घडताच स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरु केले. अग्नीशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. अग्नीशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ बचाव कार्या सुरु केले.
महापालिकेने धोकादायक घोषित केले होते
मीरा भाईंदर महानगरपालिकेने या इमारतीला धोकादायक म्हणून आधीच नोटीस दिली होती. इमारतीच्या आत कोणीही राहत नाही, खाली काही दुकाने आहेत, ती सुरू होती. इमारतीखाली उभा असलेला एक रिक्षाचालकही या दुर्घटनेत जखमी झाला आहे. आणखी दोन जण जखमी झाले आहेत.