सोयाबीनची टोकन पद्धतीने लागवड केल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होईल – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती रक्षा शिंदे
लातूर ( जिमाका ) कृषी विभागाच्या वतीने लातूर जिल्ह्यामध्ये अधिकारी कर्मचारी यांनी गावोगाव बैठका घेऊन खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढीची पंचसूत्री कार्यक्रम राबविला. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ व्हावी, अधिकाधिक उत्पादन मिळावे, कमी खर्चात निव्वळ नफा जास्तीचा मिळावा या उद्देशाने खरीप आढावा बैठका घेऊन शेतकऱ्यांना तज्ञ बनविण्यात आले. यावर्षी लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या लागवडीमध्ये बदल करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेऊन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती रक्षा शिंदे यांनी टोकन पद्धतीने सोयाबीनच्या लागवडीवर भर दिला असून त्यास शेतकऱ्यांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आज लातूर तालुक्यातील सेलू या गावी दशरथ देशमुख यांच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन टोकन पद्धतीने सोयाबीन लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. साधारणतः अडीच ते चार फुट अंतरावर वाफा तयार करून वाफ्यावर दोन ओळीमध्ये अठरा व दोन रोपांतील सहा इंच अंतरावर किंवा त्यापेक्षा अधिक अंतर ठेवून टोकन पद्धतीने लागवड केली तर उत्पादनामध्ये दुप्पट वाढ होईल असे प्रतिपादन याप्रसंगी श्रीमती शिंदे यांनी केले. लागवडीसाठी एकरी बारा किलो बियाणे लागते म्हणजेच जवळपास 18 किलो बियाणांमध्ये बचत होऊन खते, औषधे यामध्येही बचत होते. हेक्टरी रोपांची संख्या राखता येईल. अधिकचा पाऊस झाला तर सरीमधून जास्तीचे पाणी निघून जाते व पर्जन्यमान कमी झाले तर सरीमध्ये पाणी साचून जमिनीमध्ये मुरते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढते परिणामी उत्पादनामध्ये दुप्पट वाढ होते. आज श्रीमती रक्षा शिंदे यांनी टोकन पद्धतीचे लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखवले याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, मंडळ कृषी अधिकारी यशवंत दहिफळे, कृषी पर्यवेक्षक सचिन कडवकर, ओमप्रकाश चिंताले, कृषी सहाय्यक प्रियंका गिरी, प्रगतशील शेतकरी राम देशमुख, दशरथ देशमुख, कपिल तोडकर, उमेश देशमुख, संतोष चौधरी आदी शेतकरी उपस्थित होते