राज्यपाल नियुक्त १२ आमदारांतही राष्ट्रवादी काँग्रेस होणार ‘वाटेकरी’!
लातुर जिल्ह्याला मिळणार आणखीन एक आमदार?
*सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवली, शिंदे सरकार ठरवणार नव्या आमदारांची नावे
मुंबई( विशेष प्रतिनिधी):-गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीचा मार्ग मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोकळा झाला. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी ठाकरे सरकारच्या यादीला मंजुरी न दिल्यामुळे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. कोर्टाने सप्टेंबर २०२२ मध्ये या निवडीला स्थगिती दिली. मात्र आता याचिककत्यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवल्यामुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्थगिती उठवली. तसेच विद्यमान सरकार १२ नावांची नव्या शिफारस करू शकते, असे निर्देश दिले.
पूर्वीच्या आमदारांचा कार्यकाळ जून २०२० मध्येच संपला होता. त्यामुळे ठाकरे सरकारने १२ नवीन नावांची शिफारस केली. पण राज्यपालांनी निर्णयच घेतला नव्हता. त्याविरोधात काँग्रेसचे रतन सोली यांनी याचिका दाखल केली. दरम्यान, जून २०२२ मध्ये सत्तांतर झाले व शिंदे सरकारने आधीची नावे रद्द करून नवीन यादी दिली. पण न्यायालयाने निवडीला स्थगिती दिली होती.
सहा जागांवर भाजपचा दावा, शिंदे-पवारांना प्रत्येकी 3
जूनमध्ये सत्तांतर झाल्यानंतर भाजप व शिंदेसेना या दोन पक्षांचे अनुकमे ८ व ४ आमदारांची वर्णी लागेल, असे ठरवण्यात आले होते. मात्र मागील वर्षभरात ही नियुक्ती होऊ शकली नाही.
• आता सरकारमध्ये राष्ट्रवादीचा आहे. एक गट तिसरा भागीदार म्हणून सहभागी झाला आहे. त्यामुळे या १२ आमदारांमध्ये त्यांच्या गटालाही वाटा द्यावा लागेल.
समसमान जागांचे वाटप व्हावे यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहेत. पण सरकारमधील ‘सीनियरिटी’नुसार भाजपला ६ व शिंदेसेना व अजितदादा पवार यांच्या गटाला प्रत्येकी तीन जागांचे वाटप केले जाऊ शकते.
भाजपकडून चित्रा वाघ, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, मुंबईचे मोहित कंबोज, कृपाशंकर सिंह, मित्रपक्षाच्या कोट्यातून सदाभाऊ खोत यांच्या नावाची चर्चा
शिंदेसेनेकडून रामदास कदम, अर्जुन खोतकर, नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे, दीपाली सय्यद, मीनाक्षी शिंदे, मित्रपक्षाच्या कोट्यातून दलित नेते जोगेंद्र कवाडे यांच्या नावाची चर्चा आहे. • राष्ट्रवादीकडून रूपाली चाकणकर व लातुर जिल्ह्यातील सूरज चव्हाण यांची नावे चर्चे आहेत. याशिवाय अजितदादांच गटात आलेल्या काही माजी आमदारांचीही वर्णी लागू शकते.
निवडीचे निकष डावलून नेत्यांचीच लागते वर्णी
राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये कला, क्रीडा, सामाजिक- शैक्षणिक कार्याशी संबंधित व्यक्तींची निवड व्हावी, अशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रत्येक वेळी नेत्यांचीच वर्णी लावली जाते. या नेत्यांना वरील निकषांमध्ये ‘बसवण्याच’चे कसब सरकारकडून दाखवले जाते व राज्यपालही त्याला मूकसंमती देतात.