पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टिळक पुरस्कार स्वीकारणार आहेत. मग अशावेळी त्यांनी केलेल्या सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे काय झाले, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. नागपूर दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कलंकित शब्दावर राज्यात गदारोळ होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी पक्षाच्या नव्या मंत्र्यांमुळे मिंद्यांच्या नाकी नऊ आले असल्याचा खोचक टोला, उद्धव ठाकरे यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना आता मिरची देखील गोड लागत असल्याचे देखील ते म्हणाले.
चक्की पिसिंगचे काय?
भ्रष्टाचाराचे आरोप करून तुम्ही एखाद्यावर कलंक लावता त्याचे काय होते? असा सवाल त्यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. चक्की पिसिंग म्हणून अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. त्या वेळी केलेल्या त्या आरोपांचे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.
सरकार विरोधात राग
जनतेच्या मनामध्ये सरकार विरोधात राग आहे. त्यामुळे जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. सरकारचे राज्यातील समस्यांवर लक्ष नाही. त्यामुळे आता सरकारला जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्हीच भ्रष्ट्राचारचे आरोप केले हेाते
राजकारणात सुसंस्कृतपणा दाखवला पाहिजे, हे मला देखील वाटते. मात्र, तुम्ही म्हणाल तो कलंकित आणि तुम्ही म्हणाल तो देव, असे चालणार नाही. तुम्ही ज्यांच्यावर कलंक लावला होता त्यांच्या बाजूला मांडी लावून तुम्ही बसत आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नितीन गडकरी यांनी केलेल्या टीकेवर थेट उत्तर देणे उद्धव ठाकरे यांनी टाळले.