• Thu. Jun 26th, 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरद पवार

Byjantaadmin

Jul 10, 2023

पुणे: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.मंगळवारी १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३वी पुण्यनिथी आहे. या निमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना दिला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे ४१वे वर्ष आहे.

narendra modi

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देशाला जागितक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. या कार्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित राहणार असल्याचे दीपक टिळक म्हणाले. कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

काँग्रेसने केला विरोध

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार लोकमान्य टिळक यांच्या विचारांशी कधीपासून जुळायला लागले,’ असा सवाल उपस्थित करून शहर आणि प्रदेश काँग्रेसने थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच डॉ. रोहित टिळक यांच्याविषयी तक्रारीचा सूर आळवला आहे. या पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची घोषणा होण्याआधीच ही तक्रार करण्यात आली. रोहित टिळक काँग्रसचे पदाधिकारी होते; तसेच त्यांनी यापूर्वी काँग्रेसकडून कसबा विधानसभेची निवडणूकही लढवली होती. टिळक कुटुंबियांचा काँग्रेसने कायमच सन्मान राखल्याचा दावा करून प्रदेश काँग्रेसने या पुरस्काराविषयी नाराजी वर्तविली आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा पुणे दौरा चर्चेचा ठरण्याची दाट शक्यता आहे.आतापर्यंत एस.एम.जोशी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ.मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरद पवार, एन आर नारायणमूर्ती, जी माधवन नायर, डॉ.कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई.श्रीधरन, एमएस. स्वामीनाथन, डॉ.वर्गीस कुरियन अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *