सोयाबीनवर गोगलगायींचा हल्ला ; धिरज देशमुखांनी वेधले सरकारचे लक्ष
लातुर:-लातूर ग्रामीण मतदारसंघासह लातूर जिल्ह्यात यंदाही ठिकठिकाणी सोयाबीनच्या कोवळ्या मोडांवर गोगलगायींचा हल्ला होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा प्रादुर्भाव लातूर जिल्ह्यात आणखी वाढू नये यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत, अशा मागणी आमदार धिरज देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात ठिकठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या अद्याप सुरू आहेत. पेरण्या झाल्यानंतर जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सोयाबीनसह इतर पिकांची उगवण चांगली झाली आहे. तोच या कोवळ्या पिकांवर गोगलगायींचा हल्ला होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मागील वर्षाप्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांसमोर हे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांसमोर उभ्या असलेल्या या संकटाची त्वरित दखल घेवून राज्य सरकारला जिल्ह्यातील परिस्थितीची धिरज देशमुख यांनी माहिती दिली. पाऊस लांबल्याने शेतकरी बांधवांसमोर संकट उभे राहिले होते.
हे संकट दूर होते न होते तोच गोगलगायीच्या रूपाने नवे संकट उभे राहिले आहे. त्याचा प्रादुर्भाव वाढण्याआधी योग्य त्या उपाययोजना शासनाने तातडीने हाती घ्याव्यात. ज्या शेतकऱ्यांना गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे अशा शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणीही देशमुख यांनी सरकारकडे केली.