मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, ‘पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास तयार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे,’ असे त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनी अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. त्याचवेळी पंकजा यांच्याकडून या चर्चेचे खंडनही करण्यात आलेले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे.
२०१४ साली राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून पंकजा मुंडे यांचे पक्षातील आणि भाजप संघटनेतील महत्त्व हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील दावेदार असलेल्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचे पंख पद्धतशीरपणे छाटल्याची चर्चा कायमच राजकीय वर्तुळात होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर कोणतीही महत्त्वाची जबाबदारी दिलेली नाही किंवा त्यांचे राजकीय पुनर्वसनही केलेले नाही. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीवेळी भाजप पंकजा मुंडे यांना संधी देईल, अशी चर्चा होती. मात्र, या चर्चा हवेतच विरल्या होत्या. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपची राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांकडून फार महत्त्व दिले जात नसल्याचा आरोप अनेकदा केला जातो
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार असलेल्या पंकजा मुंडे या राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांपैकी एक आहेत. मराठवाड्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांवर त्यांचा प्रभाव आहे. मात्र, तरीदेखील महाराष्ट्र भाजपने त्यांना बराच काळ जबाबदारीच्या पदापासून किंवा मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून भाजप पंकजा मुंडे यांना उमेदवारी देईल की नाही, याबाबत साशंकताच आहे. या सगळ्या अनिश्चिततेमुळे पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देऊन वेगळी वाट धरणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
आगामी राजकारणाचा वेध घेऊन पंकजा मुंडे यांनी चाचपणी सुरु केल्याचे बोलले जात आहे. मध्यंतरी भारत राष्ट्र समितीकडूनही पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु, पंकजा मुंडे यांनी त्यामध्ये फारसा रस दाखवला नव्हता. परंतु, आता पंकजा मुंडे आणि काँग्रेसची गुप्त बोलणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, हे पाहावे लागेल.