नांदेड : एकीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सर्वशिक्षा अभियान, डिजीटल शाळेचा गवगवा करण्यात येतो. परंतु दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेला स्वतःची जागा आणि इमारत नसल्याने चक्क गुरांच्या गोठ्यात शाळा भरवावी लागत आहे. हे विदारक चित्र नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेल्या खिरूतांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे आहे. शाळेला इमारत नाहीय. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे या गुरांच्या गोठ्यातच घ्यावे लागत आहेत. लोहा तालुक्यात असलेल्या खिरूतांडा हे ऊसतोड कामगारांच गावं म्हणून ओळखलं जातं. या गावातील लोकसंख्या ८०० असुन गावातील ९० टक्के नागरिक ऊसतोडीसाठी सहा सहा महिने बाहेर गावी जातं असतात. आपल्या मुलांना EDUCATION साठी गावात नातेवाईकांकडे ठेवतात. मात्र या गावामध्ये कुठलीच सुविधा नाही. वर्ष २००० मध्ये या तांड्यातजिल्हा परिषदेच्या शाळेला मंजुरी मिळाली. हळूहळू विद्यार्थ्यांचा कल या शाळेकडे वाढत गेला. मात्र शाळेसाठी इमारत नाही. इमारत अभावी शिक्षकांना चक्क दहा बाय पाच एवढ्या जागेत असलेल्या जनावरांच्या गोठ्यात शाळा भरवावी लागत आहे. विद्यार्थ्यांना या गोठ्यात बसवून शिक्षण घ्यावे लागत आहे. पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून सद्या शाळेत २२ विद्यार्थी व दोन शिक्षक आहेत. मागील अनेक वर्षापासून खिरूतांडा येथे ही विदारक परिस्थिती आहे. पावसाळ्यात तर यापेक्षाही परिस्थिती गंभीर असते. शाळा भरविण्यासाठी दूसरी जागा नाही, त्यामुळे पाऊस पडला तेव्हा विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागते.
शासनाचे दुर्लक्ष
शासनाच्या कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत CM SHINDE हे नुकताच NANDED मध्ये येऊन गेले. खिरूतांडा या गावात शाळेच्या इमारतीसोबतच पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह व स्मशानभूमीचा गंभीर प्रश्न आहे. या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन अद्यापही खिरूतांडा या गावाच्या दारी पोहोचले नाही. दरम्यान, ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतु त्यांनी केवळ आश्वासने दिली. तर लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर गावात फिरकलेही नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.