अकोला: वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या 15 दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी, असा अल्टीमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरा उद्धव ठाकरें दिलाय. लवकर निर्णय झाला नाहीय तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे, असल्याचं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय. ते अकोल्यात बोलत होतेय. आंबेडकरांचं भारत राष्ट्रीय समितीसोबत संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचं हे विधान सूचक मानलं जातंय.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या 15 दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी यासंदर्भात काय बोलणं झालंय हे स्पष्ट करावे आता निवडणुका जवळ आल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही.
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबतच्या सध्याच्या बोलणीवर ‘थँक्यू’ म्हणत बोलणं टाळलंय. राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांवर अजित पवारांची स्तुती केलीय. अजित पवार ‘जे ओठात, तेच पोटात असणारा नेता’ असल्याची स्तुतीसुमनं आंबेडकरांनी अजित पवारांवर उधळली आहे.
चौकशांच्या छायेखालची लोकं अजित पवारांसोबत गेली
शरद पवारांवर होत असलेल्या ‘पेरलं तेच उगवलं’ या आरोपांमध्ये तथ्य नाही. राजकारणात परिस्थितीनुरूप राजकीय तोडफोडीचे निर्णय घ्यावे लागतात. पवारांनी आतापर्यंत राजकारणासाठी जे केलंय ते आता त्यांच्यासंदर्भात घडले आहे. राजकारणातले ‘रणछोडदास’ सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे समोर आलेत. चौकशांच्या छायेखालची लोकं अजित पवारांसोबत गेली, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.